मुंबई: प्रतिनिधी
विरोधी पक्षाने कोरोनाच्या संकटात सरकाला काही विधायक सूचना केल्या तर त्यांचे स्वागतच केले जाईल. परंतु त्यांना राजकारणच करायचे असल्याने रोज राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे. चंद्रकांतदादा पाटील यांचे खरे आंगण कोणते? पुणे की कोल्हापूर? देवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का? त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्तेच मदत करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना महाराष्ट्राची फसवणूक करणा-या भाजपच्या नेत्यांचा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव पूर्णपणे फसला असून या मेरा आंगण मेरा रणांगण या आंदोलनाचा बार फुसका ठरल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोरोना संकटाचा खंबीरपणे सामना करत असताना राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी आटापीटा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आज हसे झाले असून वारंवार राजभवनच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजपा नेत्यांनी आतातरी स्वतःच्या अंगणात म्हणजेच मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
कोरोनाच्या संकटात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी साथ दिली. पण मोदींच्या पक्षाचे राज्यातील नेतेच त्यांच्या आवाहनाला बगल देत महाराष्ट्रात राजकारण करण्यात आकंठ बुडालेले आहेत. सत्ता गेल्याने राज्यातील भाजपाचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून सत्तेसाठी त्यांची तडफड होतेय.
या आंदोलनाला जनतेचा तर नाहीच पण भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही, अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी रखरखत्या उन्हात लहान मुलांना आंदोलनासाठी उभे करून वेठीस धरल्याचे पहायला मिळाले. विविध राज्यांतील ५० लाखांहून अधिक मजुरांना रोजगार देणा-या महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. केंद्राला कररूपाने सर्वाधिक उत्पन्न देऊनही महाराष्ट्राला केंद्राकडून अपेक्षित मदत दिली जात नाही. वैद्यकीय उपकरणे, PPE कीट, टेस्टिंग कीट, औषधे आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य मागणीच्या अवघे ३० टक्के पुरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रातील ८.५० कोटी नागरिकांना रेशनद्वारे धान्य पुरवठा केला जात आहे यासाठी केंद्र सरकारकडे गहू पुरवठा करण्याची मागणी केली. पण केंद्र सरकारने अद्याप गहू दिला नाही. फडणवीसांनी अंगणाला रणांगण बनविण्यापेक्षा पक्षातले आपण वजन खर्च करून महाराष्ट्राच्या हिश्श्याची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे थोरात म्हणाले.
संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनवणे हे कुठले शहाणपण आहे? राजकारणासाठी आयुष्य पडले आहे, आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे. इतिहास भाजपाची आजही ही काळी कृती कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Tags balasaheb thorat bjp chandrakant patil congress covid-19 devendra fadnavis
Check Also
मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …