अतिशय कठीण काळात बाबा आमटेंनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती, तिरस्कार होत होता, अशा काळात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले. आज ७५ वर्षानंतर अनेक प्रतिष्ठित लोक या संस्थेची जुळले आहेत. या सर्व लोकांना आनंदवनातून आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळेच आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या ७५ व्या वर्षपुर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभाग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अशोक उईके, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी राज्यपाल राम नाईक, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, करण देवतळे, महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आदी उपस्थित होते.
मानवी संवेदनाची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पाहायला मिळते, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाबा आमटे यांनी विविध उपक्रमातून संपूर्ण समाजासाठी संवेदना तयार केली आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. ७५ वर्षाची वाटचाल अतिशय महत्त्वाची आहे. त्या काळात हा भाग अतिशय मागासलेला असताना बाबांनी हा प्रकल्प हाती घेतला. केवळ कुष्ठरोगांची सेवा नव्हे तर समाजसेवेची विविध क्षेत्रे जलसंधारण, पर्यावरण रक्षण असे अनेक प्रयोग येथे सुरू आहेत. आनंदवनच्या सकारात्मक कामातून हजारो तरुणांना समाजासाठी उत्तरदायित्व केले आहे. आपले संपूर्ण जीवन आमटे कुटुंबियांनी या प्रकल्पासाठी समर्पित केले आहे.
अनेक अडचणींचा सामना आनंदवनला करावा लागत असला तरी विचलित न होता आनंदवनचे काम निरंतर सुरू आहे. विविध क्षेत्रातील लोक या संस्थेसोबत जुळले आहे. यात कला, संगीत, फिल्म, उद्योग आदींचा समावेश आहे. मूलभूत सेवेचा उत्कृष्ट नमुना आनंदवनात आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा प्रधानमंत्री यांचा संकल्प :
प्रधानमंत्री मोदी यांचा २०२७ पर्यंत कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा संकल्प आहे. या कामासाठी शासनाला आनंदवन सारख्या संस्थांची मोलाची मदत घ्यावी लागणार आहे. सन २०१५ मध्ये भारतात प्रती लक्ष ९.७३ कुष्ठरुग्ण सापडायचे. आज प्रती लक्ष ५.५२ रुग्ण आढळतात. त्यामुळे आपल्याला मोठे काम करावे लागेल. यात आनंदवनचा मोठा सहभाग राहील.
आनंदवनच्या अनुदानात वाढ :
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आनंदवन येथे कौशल्य विकास केंद्र, निवासी ५०० लोकांचे केंद्र सुद्धा येथे सुरू होणार आहे. सन २०१२ पासून आनंदवनला देण्यात येणाऱ्या अनुदानात आता बदल करण्यात येत असून प्रती रुग्ण २२०० ऐवजी आता सहा हजार रुपये तर पुनर्वसन अनुदान अंतर्गत प्रती रुग्ण दोन हजार वरून सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. आनंदवनला १० कोटी रुपये कॉर्पस फंड लगेच देण्यात येईल. उर्वरित ६५ कोटी रुपये कॉर्पस फंड देण्याकरीता शासन पुढाकार घेईल. आनंदवन ही समाजाची संस्था आहे. सकारात्मक संस्थेच्या मागे उभे राहणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही यावेळी सांगितले.
आनंदवन येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय : उद्योगमंत्री उदय सामंत
यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, आनंदवन येथे दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू होत असून उद्योगांशी त्याचा समन्वय करून देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना नोकरी मिळण्यास मदत होईल. शासन म्हणून आनंदवनला पाठबळ देण्याची आमची जबाबदारी आहे. आनंदवन येथील किमान २ टक्के काम, इतर ठिकाणी करू शकलो, तर ती बाबा आमटे यांना खरी श्रद्वांजली ठरेल. सकारात्मक पध्दतीने राज्य चालविणारे आनंदवनला कोणतीही मदत कमी पडू देणार नाही. आनंदवनची उर्जा प्रेरणादायी आहे. येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय आहे, असे यावेळी सांगितले.
विविध बाबींचे ऑनलाईन उद्घाटन :बाबा आमटे यांच्या जीवनावर मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषेवर आधारीत चित्रपटाचे ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याशिवाय एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. (महारोगी सेवा समिती) ॲज हेल्थ कॅपिटल, सोमनाथ येथील श्रमतीर्थ, आनंदवनला डब्ल्यूसीएल कडून मिळालेल्या सोलर पॉवर जनरेशन प्रोजेक्ट, एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. ॲज स्कील डेव्हलपमेंट कॅपिटल आदींचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ आमटे यांनी केले. संचालन वसुंधरा काशीकर – भागवत यांनी तर आभार डॉ. दिगंत आमटे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.
Marathi e-Batmya