Breaking News

संजय राऊत म्हणाले, त्यांच्याकडून निष्ठेच्या चार गोष्टी शिका लीलाधर डाके, मनोहर जोशी यांच्या भेटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावित सेनेच्या ४० आमदारांना सोबत घेवून भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदेंच्या या भेटींवरुन शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावत म्हणाले, त्यांच्याकडून निष्ठेच्या चार गोष्टी शिका असा खोचक सल्ला दिला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संजय राऊत हे सध्या नवी दिल्लीत आहेत. तेथे राऊत हे पत्रकारांशी बोलत बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त दिली.

मनोहर जोशी आणि लीलाधर डाके हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक कडवट शिवसैनिक म्हणून कठीण प्रसंगात ठामपणे उभे राहिले. डाके आणि जोशी सरांकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अनेक वादळात, संकटात शिवसेनाप्रमुख, शिवसेनेबरोबर ते निष्ठेने राहिले. अशा कडवट शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. नक्कीच यातून त्यांना प्रेरणा आणि बोध मिळेल असेही ते म्हणाले.

मनोहर जोशी, लीलाधर डाके पक्षाचे निष्ठावान नेते आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखं फार आहे. मुख्यमंत्री अशा नेत्यांच्या भेटीसाठी जात असतील तर निष्ठेच्या गोष्टीही शिकल्या पाहिजेत असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
शिंदे गटाकडून होत असलेल्या नियुक्तांवर बोलताना ते म्हणाले, शिवसेना इथेच आहे. ते कोणत्या पक्षासाठी नियुक्त्या करत आहेत? त्यांना काय अधिकार आहे? हा भातुकलीचा पोरखेळ सुरु आहे. त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाहत नाही. तुम्ही तुमचा वेगळा पक्ष स्थापन करा आणि आपलं अस्तित्व दाखवा असं आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही या मताशी मी ठाम आहे. ते स्वप्न असू शकतं. काहींना कोणत्याही मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणायची आहे. पण ही सत्ता मिळेल त्या मार्गाने आणायची नाही. लोकशाही मार्गाने आम्ही सत्ता आणू आणि ती वेळ लवकरच येईल असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात दौरा करणं जनतेसाठी चांगली गोष्ट आहे. आज राज्यात ठिकठिकाणी महापूर आला आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. अजून राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या असताना त्यातून वेळ काढत राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी फिरणार असतील तर त्यात टीका करण्यासारखं काही नाही असेही त्यांनी सांगितले.

आम्ही कायद्याचं पालन करणारे आहोत. राजकीय दबावासाठी ईडी चौकशी सुरु आहे. माझा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. पण संजय राऊत काय आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे. माझ्यावर कोणत्याही माध्यमातून कितीही दबाव आला तरी हा संजय राऊत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबतच राहणार, गुडघे टेकणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

मेहबुबा मुफ्ती यांचा आरोप, निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्या…

लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर पुलवामा जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली होती आणि त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *