राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरु होणार असतानाच आज रविवारी एक दिवस आधीच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ९ मंत्र्यांच्या गटाने शरद पवार यांची वाय.बी.चव्हाण सेंटर येथील त्यांच्या कार्यालयाला अचानक भेट देत आर्शिवाद घेतले. त्यामुळे राजकिय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या बंडाला छुपे समर्थन देणारे भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, त्यात काही वावगं वाटत नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या भेटीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची मला कल्पना नाही. मात्र, वर्षानुवर्षे शरद पवार त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे भेट घेतली, तर त्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही. यातून काही राजकीय समीकरणं तयार होतील का याची मला कल्पना नाही, असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
शरद पवार यांच्या भेटीसाठी हसन मुश्रीफ, अजित पवार, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आदी नेते शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते.
यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, पवारांच्या भेटीला कोण आले आहे मला माहिती नाही. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला, म्हणून मी वाय.बी.सेंटरला तातडीने दाखल झालो आहे. मला फक्त येथे भेटायला बोलावले आहे.
तर, शरद पवारांचा आशीर्वाद घ्यायला, मार्गदर्शन घेण्यासाठी हे बंडखोर आमदार पवारांच्या भेटीला गेले असतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली आहे.