पुणे : प्रतिनिधी
औरंगाबादेतील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या त्या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया काय असेल अशी उत्सुकता लागू राहीली होती. त्यानुसार अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की, मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. प्रत्येकाला काय बोलायचे अधिकार आहेत. त्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही. माझ्याशी बोलताना ते राज्याला नेहमी पुढे नेण्याविषयी बोलत असतात असे स्पष्ट केले.
पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी मला माजी मंत्री म्हणू नका असे वक्तव्य केले. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील काय म्हणाले ते मला माहित नाही. मात्र त्यांना केंद्रात मंत्री करणार असतील तर पंतप्रधान मोदींनाच माहिती असेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
राज्यातील आगामी महापालिकामधील प्रभाग पध्दतीत बदल करण्याच्या अनुषंगाने बहु प्रभाग पध्दत, एक प्रभाग पध्दती की दोन प्रभाग पध्दत असणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक होणार असून त्यावेळी याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण वाचविण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. निर्णय घेत नाही म्हणून आधी निर्णय घेत नाही म्हणून टीका करायची आणि घेतला तर सर्वोच्च न्यायालयात टीकेल का? असा सवाल करायचं. किती नकारात्मक विचार करणार अशी उपरोधिक टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.
दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आजी-माजी आणि भावी सहकारी वक्तव्यावरून भाजपाच्या गोटात खुषीची लहर उमटली असून आता महाआघाडीचे सरकार आता कोसळणार अशी आशाच निर्माण झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटल्याप्रमाणे या पाच वर्षात तरी भाजपा आणि शिवसेना एकत्र येणार नसल्याचे भाकित खरे ठरणार की यात बदल होणार याचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळणार आहे. मात्र आतापर्यंत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रत्येक कार्यक्रमात आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. परंतु औरंगाबादमधील कार्यक्रमात पहिल्यांदाच भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून भावी साथिदार असा उल्लेख केला. त्यामुळे शिवसेना भाजपाला टाळीसाठी हात पुढे तर करत नाही ना? अशी अटकळ बांधली जात आहे.