Breaking News

मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री पाटील यांच्या कार्यक्रमाकडे पुणेकरांनी फिरवली पाठ फक्त काही निवडक व्यक्तीच झाले उपस्थित

राज्यातील ११ उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर कार्यक्रम आज पार पडला. तसेच नितीन गडकरी हे कार्यक्रमास ऑनलाईन सहभागी झाले होते. मात्र या कार्यक्रमाकडे पुणेकरांनी आणि भाजपा-शिंवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच चक्क पाठ फिरवली असल्याचे चंद्रकांत पाटील यांच्या ट्विटर खात्यावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओतून उघडकीस आले आहे.

पोलिस मैदानावरील कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य असा मंडप उभारण्यात आला होता. एक हजार नागरिकांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. पण साडेतीन वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील नागरिकांनी कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. यामुळे आयोजकांवर प्रशिक्षणार्थ महिला पोलिस कर्मचाऱ्याना कार्यक्रमांच्या ठिकाणी बोलविण्याची वेळ आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाच वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीमधून उतरताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कार्यक्रमाबाबत माहिती सांगत होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ऑनलाईन कार्यक्रम घेतला असता तर बरं झालं असतं असं चंद्रकांत पाटील यांना सांगितले.

या कार्यक्रमाला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सभागृहातील पुढील आणि मागील बाजूची अनेक आसने रिकामी असल्याचे दिसून आले. त्यामुळे खुर्च्या उचलून ठेवण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने (महारेल) राज्यातील विविध ठिकाणच्या नऊ उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ पुलांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या उड्डाणपुलांमुळे सातारा, कोल्हापूर, हिंगोली येथील रेल्वे वाहतूक विनाअडथळा सुलभ होणार आहे. रेल्वे फाटकावर अपघात कमी व्हावेत, वाहतूक कोंडी होऊ नये, सुलभ आणि विनाअडथळा प्रवास व्हावा, याकरिता राज्याच्या विविध भागांत उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यापैकी नऊ उड्डाणपुलांचे लोकार्पण, तर ११ उड्डाणपुलांचे भूमिपूजन झाले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय मैदान येथे हा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी हे दूरदृश्य प्रणलीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले.

पाटण, अतिग्रे, रहिमतपूर, अंमळनेर, शिंदखेडा, हिंगोली, उमरखेड, डोंगरगाव आणि बुटीबोरी येथील उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. पालघर, ठाणे, नगर, सातारा, सांगली, सोलापुरातील दोन, धाराशिव, लातूर, जळगाव आणि बुलढाणा येथील उड्डाणपुलांचे भूमिपूजन या वेळी करण्यात येणार आहे.

दरम्यान, महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात १०० रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार असून पुढील पाच वर्षांत राज्यातील रेल्वेचा प्रवास फाटकमुक्त करण्याचे प्रस्तावित आहे. महारेलकडून राज्यात विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारने १३ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *