मागील काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेल्या संजय राऊत यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा नोंदवून तुरुंगवास भोगल्यानंतर आता ईडीने कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना आणि संजय राऊत यांच्या मुलीला ईडीने नोटीस पाठविली. या ईडी नोटीसीवरून संजय राऊत यांनी ईडीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत ती नोटीस पाठविणे म्हणजे हास्यास्पद आणि मुर्खपणाचे असल्याची खोचक टीका केली.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, खिचडी बनविण्यासाठी माझे भाऊ संदीप राऊत यांच्या हॉटेलमधील किचनचा वापर केला होता. माझ्या मुलीने त्यांना मदत केली होती. त्यासाठी ईडीने त्यांना नोटीस पाठवली हे हास्यापद आणि मुर्खपणाचे असून हे मोदींचे राज्य आहे की औरंगजेबाचे, देवेंद्र फडणवीसांचे राज्य आहे की अफझलखान, शाईस्तेखानाचे, की निजामशाही आली आहे, अशा खोचक शब्दात टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आमच्या घरातील लोक चौकशीला ठामपणे उभे राहतील, काय करायचे ते करा, आम्ही गुडघे टेकणार नाही, असा सांगत ही ईडीची नाही तर भाजपाची कारवाई आहे अशी टीकाही केली.
संजय राऊत म्हणाले की, दोन-पाच लाखांच्या व्यवहारासाठी भाजपा सरकारकडून विरोधकांना ईडीच्या नोटीसा पाठवल्या जातात, ते काय चिंचोके खातात का असा टोला लगावत भाजपावाल्यांची बायकापोरे लंडनमध्ये स्वतःचा व्हिला घेऊन सहा-सहा महिने राहतात, त्याचे प्रायोजक कोण आहेत ते सांगू का असा सूचक इशारा देत आमच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे संस्कार असल्याने आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही, असा इशाराही दिला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमचे घर डरपोक लोकांचे नाही, आमच्या रक्तात शिवसेना आहे. स्वाभिमानी मराठी माणसे आहोत आम्ही. हा महाराष्ट्र स्वाभिमान्यांचा आहे. जे डरपोक, गांडू होते ते तुमच्या कळपात शिरले, आम्ही जाणार नाही. हिंमत आहे तर भाजपाने आमच्याशी लढावे, ते नामर्द आहेत, अशी टीका करत ईडी फिडीवाले आहेत ना त्यांना नंतर आम्ही नोटीसा मारू. बेकायदेशीर चौकशीला बोलवणाऱ्या ईडीवाल्यांना नोटीसा मारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू, असा इशाराही दिला.
संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या विषयी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता, परंतु कारवाई केली नाही. ७० हजार कोटीचा घोटाळा बाहेर काढून अजित पवारांना भाजपाने सरकारच्या तुरुंगात टाकले. उपमुख्यमंत्री बनवले. एका मांडीवर अजित पवार, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ आणि खांद्यावर प्रफुल पटेल., अशी खिल्लीही उडवली. भाजपा रामाची पुजा करतो, भाजपाचा वधही रामच करणार आहे, असे सूचक वक्तव्यही केले.