लग्न होवूनही पती सोबत राहत नसल्याच्या आणि सय्यद मोहम्मद अन्सारी हा त्रास देत असल्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करूनही त्यावर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे मंत्रालयात दाद मागण्यासाठी आलेल्या महिलेने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच धावाधाव केल्याने पुढील अनर्थ टळला.
चेंबूर परिसरातील समता नगर येथे श्रीमती दिपाली खंडू भोसले या रहात आहेत. त्यांचे लग्न होवूनही मागील सात वर्षापासून त्यांचे पती त्यांच्या सोबत न राहता अन्य एका महिलेसोबत रहात आहेत. तसेच या महिलेस सय्यद मोहम्मद अन्सारी हा मुस्लिम व्यक्ती सतत त्रास देतो. याविरोधात आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. परंतु पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नव्हती. त्याविरोधात मंत्रालयातील गृह विभागात दाद मागण्यासाठी सदर महिला दिपाली भोसले या आज मंत्रालयात आली होती. मात्र तिला मंत्रालयात न सोडल्याने तीने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मंत्रालयातील पोलिसांनी दिली.
दरम्यान, सदर महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु तिला अचानक घेरी येवून खाली कोसळल्याने तीला पोलिसांनी तातडीने जी.टी.हॉस्पीटल येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले.