Breaking News

अजित पवार यांचा निशाणा, ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणली जातेय...

मुंबईतील शासकिय वसतीगृहात मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येनंतर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सरकारला धारेवर धरले. तसेच असल्या घटना राज्यात सातत्याने वाढत आहेत. याबद्दल सरकार कठोर भूमिका का घेत नाही असा सवालही अजित पवार यांनी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांना केला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहाटे अशा घटना घडतात. मुंबईतच नव्हे तर राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात मुलींना, मुलांना, महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. मात्र असे घडताना दिसत नाही. याला पोलिस आणि सरकार जबाबदार आहे असा थेट आरोपही केला.

यावेळी त्या घटनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, वसतीगृहात वास्तविक त्या नराधमाला सुरक्षारक्षक म्हणून कसे नेमण्यात आले. यामध्ये वस्तुस्थिती काय आहे, कितीजणांनी हे कृत्य केले आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करतानाच अजित पवार यांनी मुलींच्या किंवा महिलांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजी राहणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध केला.

तसेच अजित पवार यांनी सांगितले की, ही झालेली घटना लक्षात घेऊन राज्यात जिथे- जिथे वसतीगृह आहेत तिथे सुरक्षेची व्यवस्था नीट आहे का याची माहिती घ्यावी. या घटनेचा तपास ज्यांच्याकडे आहे त्यांनी ताबडतोब खोलवर जाऊन धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत आणि कोण जबाबदार आहे याचा छडा लावला पाहिजे अशी मागणीही केली.

तसेच औरंगजेब डिपीप्रकरणावरून बोलताना अजित पवार म्हणाले की, आज कोल्हापूर बंद आहे. कोल्हापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणण्याच्या काही घटना जाणीवपूर्वक करण्यात आल्या त्याआधी सुध्दा वेगवेगळ्या भागात दंगली घडवून आणण्यासारखे प्रकार होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अडचणीत येत आहे. येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून समाजासमाजामध्ये अंतर पाडण्याचे काम किंवा द्वेष निर्माण करण्याचे काम काही शक्ती जाणीवपूर्वक करत आहेत का? त्यातून त्यांना वेगळा स्वार्थ साधायचा आहे का असा थेट सवाल केला.

अलीकडच्या काळात ज्या घटना घडत आहेत त्याच्याबद्दल खोलात जायचं म्हटलं तर मोबाईल कुणाचे, कुठे गेले आहेत. व्हॉटस्ॲपवर काय बातम्या आल्या आहेत. कुणी व्हायरल केले आहे. हे तपासायचं म्हटलं तर तपासता येतं. परंतु या गोष्टीचा छडा लागलाच पाहिजे अशापध्दतीची भूमिका राज्यकर्त्यांची असली पाहिजे आणि पोलीस खात्याचे काम करणार्‍या अधिकारी वर्गाची असली पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

अजित पवार म्हणाले, कालच कोल्हापूरमध्ये पोलिसांना आणि मिडियाला तिथल्या लोकांनी आंदोलन करत असताना कोल्हापूर बंद करणार असे सांगितले होते. वास्तविक त्याच्या आधी पोलिसांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन किंवा अशाप्रकारच्या घटना घडतात त्यावेळी शांतता कमिटी असते किंवा स्वयंसेवी संस्था काम करणाऱ्या असतात त्या – त्या शहरात, तालुक्यात, जिल्हा ठिकाणी पोलीस यंत्रणा असते त्यांना कुणाला एकत्र घेतल्यानंतर नीटपणे हाताळता येईल ही इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे असते. फक्त त्याला राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे आणि सरकारचा त्यांना क्लीअर आदेश असला पाहिजे की हे घडू द्यायचे नाही असेही म्हणाले.

अशाप्रकारच्या गोष्टी आमच्याही काळात घडल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना विश्वासात घेतले आणि सरकार याबाबत कडक भूमिका घेणार आहे हे सांगितले तर त्यावेळी ते हाताळण्याची आपल्या पोलीस दलाची क्षमता आहे असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

वेगवेगळ्या जाती, धर्म, पंत हे सगळेजण यामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र कुठल्या जातीने, पंथाने एखाद्याचा द्वेष करा असे सांगितले नाही परंतु वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी व सत्तेत आल्यावर ७५ हजार नोकरभरती करु या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता आल्या नाहीत त्यामुळे जाणीवपूर्वक कुणी खतपाणी घालतंय का? याचा मास्टरमाईंड कोण आहे? कोण हे करण्यासाठी प्रोत्साहित करतंय? या सगळ्याचा छडा लावण्याचे काम पोलीस खात्याने केले पाहिजे असे अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले.

औरंगजेबाचे समर्थन करण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्याला कोण समर्थन देईल? त्यामुळे याला वेगळया प्रकारचे स्वरूप देऊ नका. अफजलखान असेल औरंगजेब असेल कुणीही त्यांचे समर्थन करणार नाही. अशाप्रकारच्या बातम्या पसरवून लोकांच्या मनात गैरसमज पसरवून समासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम होता कामा नये. जातीय सलोखा टिकवला गेला पाहिजे. गेले कित्येक वर्षे गुण्यागोविंदाने आपण रहातोय त्याला कुठेही डाग लागता कामा नये हीच पध्दत पुढे चालू ठेवली पाहिजे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *