नुकत्याच झालेल्या युपीएससी परिक्षेत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेकांनी उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले. याउत्तीर्ण झालेल्या गुणवतांचा सत्कार करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचा एक किस्सा आज दहावीत ४२ टक्के गुण पडलेत तो आज आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करतोय असे सांगत आज तुम्हाला लोकशाही कशाला म्हणतात हे आज तुम्हाला कळले असेल असे वक्तव्य करत मिश्किल टीपण्णी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
तत्पूर्वी राज ठाकरे यांनी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या या गुणवंतांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तुम्ही महाराष्ट्र्राबद्दलची आपुलकी कायम ठेवली पाहिजेत, असा सल्ला देत आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आपल्या राज्याबद्दल प्रेम असू शकतं, तर तुम्हाला तर असलंच पाहिजे. त्यांना वाटतं ना बऱ्याच गोष्टी आपल्या गुजरातमध्ये आल्या पाहिजेत, तसं वाटणं साहजिक आहे. प्रत्येकाच्या मनात आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं, तुमच्या मनातही आपल्या राज्याविषयी ठासून असलं पाहिजे. तुम्ही उद्या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाल, पण महाराष्ट्राचा विचार तुमच्या मनातून जाता कामा नये, असा सल्लाही दिला.
यावेळी राज ठाकरे यांनी बीएमड्ब्लू कंपनीचा आणि त्यावेळचे मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांची आठवण सांगताना म्हणाले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीएमडब्ल्यू कंपनीचा महाराष्ट्रातील प्रकल्प दक्षिणेकडील राज्यात कसा गेला, याचा किस्सा सांगताना म्हणाले, विलासराव देशमुख यांना बीएमडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांशी बोलायला फार वेळ नव्हता. तेव्हा विलासराव देशमुख यांनी आपल्यासोबतच्या अधिकाऱ्यांना बीएमडब्ल्यू कंपनीच्या शिष्टमंडळाशी बोलून घ्यायला सांगितले. कंपनीचं शिष्टमंडळ आल्यानंतर विलासराव देशमुखांनी त्यांच्याशी चर्चा केली. पण बैठकीला सुरुवात झाल्यापासून विलासराव देशमुख प्रकल्पासाठी लागणारी जमीन, सवलती अशा प्रत्येक मुद्द्यावर नकारघंटा वाजवत राहिले. त्यामुळे बीएमडब्ल्यूचे शिष्टमंडळ निघून गेले. त्यावेळी विलासराव देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या एका दाक्षिणात्य अधिकाऱ्याने तामिळनाडूतील त्याच्या सहकाऱ्याला फोन लावला. या अधिकाऱ्याने बीएमडब्लूच्या अधिकाऱ्यांचे फोन नंबर आणि इतर माहिती तामिळनाडूतील सहकाऱ्याला दिली. बीएमडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना आत्ता बोलावून घ्या आणि त्यांच्याशी चर्चा करा, असे त्याने सांगितले. त्यानंतर बीएमडब्ल्यूचा कारखाना तामिळनाडूत गेल्याची आठवणही सांगितली.