Breaking News

राज्यातील शेतकऱ्यांना अचूक हवामानाची सूचना देणार ‘महावेध’ २०६० स्वयंचलित हवामान यंत्रे कार्यान्वित

मुंबई : प्रतिनिधी

लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना राज्य सरकारने कार्यान्वित केली आहे. ही अचूक माहिती मिळण्याकरीता ‘महावेध’  ही योजना सुरु करण्यात आली असून या यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे योग्य व्यवस्थापन आणि नुकसान टाळण्यासाठी मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात एक अशी २०६० स्वयंचालित हवामान केंद्रे स्थापन केली असून त्याद्वारे गावस्तरापर्यंतच्या शेतकऱ्याला हवामानाचा अचूक अंदाज आणि माहिती प्राप्त होणार आहे. सध्याची हवामानविषयक यंत्रणा संपूर्ण राज्यातील हवामानाची एकत्रित माहिती देण्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर हवामानाचे अचूक अंदाज वर्तविणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ,एखाद्या गावात काही भागात पाउस तर लगतच्या गावात मात्र कोरडे हवामान एकाच वेळी आढळते. या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे हवामानाशी संबंधित परिपूर्ण आणि अचूक माहिती मिळणार आहे. हवामानाची खरी स्थिती वेळेआधी प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांना पावसाचा, गारपीटीचा अंदाज आधीच मिळेल आणि त्यानुसार ते संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाय योजना करू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या राज्यात शेती हवामानावर आधारित आहे. गेल्या काही वर्षातील हवामानातील वाढत्या बदलामुळे अवेळी पाऊस, गारपीट, वादळ, यांचा तडाखा पिकांना बसून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे.  ही स्वयंचलित हवामान यंत्रणा स्कायमेट या हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी तत्वावर बसविण्यात आली आहे. सध्या राज्यात हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या आठ मोठ्या कंपनी आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून हवामानाविषयी सर्वसाधारण माहिती आणि अंदाज वर्तविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले कि सरकारने यापूर्वीच ‘एम-किसान’ सल्लागार यंत्रणा अमलात आणली असून त्याद्वारे  ५० लाख शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून हवामानासंबंधी सामान्य माहिती पोहचविली जात आहे. परंतु राज्यात १.३७ कोटी शेतकरी आहेत.त्यापैकी केवळ ५० लाख शेतकरीच या व्यवस्थेवर नोंदले गेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना ही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात एलइडी स्क्रीन उभारून त्याद्वारे हवामानाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.

Check Also

कृषी उडान योजनेअंतर्गत राज्यातील या विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *