मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येला आळा घालण्यासाठी आणि कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१८ खाली कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. परंतु ही योजना सर्वस्वी फ्लॉप योजना ठरल्याची टीका राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली.
राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यात बँका आणि प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सातत्याने टीका करत होते. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सातत्याने सूचनाही करत होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नियुक्ती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्ष पदी केली. परंतु आता त्यांनीच राज्य सरकारची कर्जमाफीची योजना फ्लॉप ठरल्याची टीका केल्याने राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या दाव्यातील फोलपणा उघडकीस आला आहे.