उपचाराअभावी ठाणे पालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता मागील २४ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले होते. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र २४ तासांत इतके मृत्यू झाल्याने पालिका रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
कळवा रुग्णालयावर सध्या प्रचंड ताण असून इतर विभागाबरोबर मलेरिया आणि डेंग्यूच्या रूग्णांवरही उपचार सुरू आहेत. त्यातच मागील २४ तासांत १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रचंड अनागोंदी, डॉक्टरांची अपुरी क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. तर यातील १३ रुग्ण हे आयसीयूमधील तर ४ रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. १० ऑगस्ट रोजी एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते.
यावेळी रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ राम बारोट यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘मृत्यू पावलेल्या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. यातील एका रुग्णाने विष प्राशन केले होते, तर एकाला सर्पदंश झाला होता. प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे आहे’ .
एकाच रात्री १६ रुग्णांच्या मृत्यूबाबत स्पष्टीकरण देताना शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता राकेश बारोट म्हणाले, मृतांमध्ये एक चार वर्षांचा मुलगा होता. त्याने मोठ्या प्रमाणात रॉकेल प्यायलं होतं. त्यामुळे आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. बाकीचे काही रुग्ण मागील काही दिवसांपासून उपचार घेत होते. कुणी तीन दिवस तर कुणी चार दिवसांपासून उपचार घेत होते.”
पुढे बोलताना डॉ राम बारोट म्हणाले, एका रुग्णाच्या डोक्याला मार लागला होता. या अज्ञात रुग्णाचाही मृत्यू झाला. तर अन्य एका रुग्णाच्या मेंदूला ट्रॉमा होता, त्यांचाही मृत्यू झाला. दोन रुग्णांची फुफ्फुसं खराब होती. त्या रुग्णांना संसर्ग होऊन मृत्यू झाला. इतर तीन-चार रुग्णांना मल्टी ऑर्डर डिस्फंक्शन झालं होतं. कुणाला हृदयाची समस्या होती, तर कुणाला अनियंत्रित मधूमेह होता. अशा रुग्णांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांना वाचवू शकलो नाही, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली.
डॉ राम बारोट म्हणाले, आम्ही ५०० बेडच्या रुग्णालयात जवळजवळ ६०० रुग्ण अॅडमिट केले आहेत. येथील डॉक्टर्स २४-२४ तास काम करत आहेत. आम्ही शक्यतो कोणत्याही रुग्णाला परत पाठवत नाही. इकडे येणारा प्रत्येक माणूस गरीब किंवा आदिवासी असतो. ते अनेकदा अत्यावश्यक स्थितीत येतात. ते कसल्याही स्थितीत आले तरी आम्ही त्यांच्यावर उपचार करतो, असंही स्पष्ट केले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तसेच हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून माहिती जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.