मुंबई: प्रतिनिधी
आधीच केंद्र सरकारकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता लोकल रेल्वे स्थानकापासून ते आपल्या घरी जाण्यासाठी टॅक्सी, रिक्षाचा वापर करणाऱ्या मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही आता राज्य सरकारकडून ३ रूपयाने महाग केल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
मुंबईत रिक्षा व टॅक्सीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये तर, रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये झाले आहे. १ मार्चपासून ही भाडेवाढ लागू होणार असुन, ३१ मे पर्यंत कार्डनुसार हे भाडं आकारता येणार आहे. तसेच, मुंबई एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सुरू असलेल्या दर वाढीमुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. मात्र भाडेवाढीने त्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुसऱ्याबाजूला सर्वसामान्य मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांचा मात्र खिसा रिकामा होणार आहे.
खटुआ समितीच्या शिफारशीनुसार एमएमआर रिजनमधील रिक्षा टॅक्सीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरात भाडेवाढ करण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयात परिवहन विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी खटुआ समितीने दिलेल्या शिफारशीनुसार रिक्षा आणि टॅक्सी प्रवासात भाडेवाढ करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबईसह महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सी प्रवासात ३ रूपयाने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.