शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षाची अर्थात पीआरपी आज युती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीआरपीचे प्रमुख प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेला बाळासाहेबांची शिवसेना आणि पीआरपीचे अनेक नेते उपस्थित होते.
शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाची एकाबाजूला युती असताना दुसऱ्याबाजूला आरपीआय नंतर आता महायुतीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाची भर पडली.
उध्दव ठाकरे यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांच्याशी बोलणी सुरु केली होती.
यावेळी बोलताना पीआरपी पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे म्हणाले, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या कामाने प्रभावित झालेल्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या पक्षासोबत युती करावी असा आग्रह धरला होता. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकांमध्येदेखील हाच सूर असल्याने हि युती करण्यात येत असल्याची माहिती प्रा जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी दिली आमच्या या युतीच्या जाहीर सभा महाराष्ट्रातील पाच महसुली विभागात घेण्यात येणार असल्याची घोषणाही प्रा कवाडे यांनी यावेळी बोलताना केली. युतीमध्ये जेवढ्या जाग आमच्या पक्षाच्या वाट्याला येतील त्या लढविण्यात येतील अशी माहितीही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तर प्रा कवाडे हे आक्रमक अभ्यासू नेते असून चळवळीसाठी त्यांनी संघर्ष करून जेल भोगले आहे. आम्ही देखील शिवसेनाप्रमुखांचा विचार आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीप्रमाणे संघर्ष करीत लाठयाकाठ्या खाल्ल्या आहेत. प्रा कवाडे यांनी ऐतिहासिक लॉन्ग मार्च काढला होता. त्यांचा हा लॉंग मार्च आता योग्य ठिकाणी येऊन थांबला आहे असे उद्गागार काढले.
वंचितची ठाकरे गटासोबत युती होत असल्यामुळे तुमची हि युती होत आहे काय असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी केला असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे देखील माझे चांगले मित्र आहेत. राजगृह येथे आमची भेट झाली चर्चा देखील झाली. परंतु ही चर्चा राजकीय नव्हती असे स्पष्ट केले. प्रा कवाडे यांच्यासोबत आमची फार पूर्वीपासून चर्चा सुरु आहे ही चर्चा आज प्रत्यक्षात उतरली. कवाडे हे आमच्यासोबत आले आहेत शिवाय रामदास आठवले यांची भाजपासोबत युती आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने आमची शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली असल्याचेही त्यांनी सांगितले.