माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अँड प्रकाश आंबेडकर एकत्र येणार अशी चर्चा सुरु असताना आता शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना आणि दलित पँथर एकत्र येणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून हाती आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. लवकरच दलित पँथर संघनेच्या राज्य ‘कार्यकारिणीचे सदस्य शिंदे गटाला (अर्थात बाळासाहेबांची शिवसेना) पाठींबा देणार असल्याचे सुतोवाच शिंदे गटाचे नेते व राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी केले.
त्यामुळे शिंदे गटाला आता निळा झेंडा साथीला मिळणार आहे. दरम्यान उध्दव ठाकरे यांनी थेट डॉ.आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनाच सोबत घेण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी खेळलेल्या राजकिय खेळीची कॉपी दलित पँथरला सोबत घेऊन शिंदे गटाने केल्याचे बोलले जात आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भारतीय जनता पार्टीची युती आहे. त्यामुळे भाजपाला निळ्या झेंड्याची साथ मिळाली आहे, चार महिन्यापूर्वी राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्या नंतर शिंदे फडणवीस सरकार राज्यात अस्तित्वात आले. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहेत.आता तर दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अशा दोन पक्षांना मान्यता दिली आहे.
आता निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठावले आहे. त्यामुळे दोन्ही गटाला वेगवेगळी चिन्हे आयोगाने दिली आहेत. प्रत्येक ठिकाणी पावलावर पाऊल टाकत शिंदे गटाने ठाकरे गटावर बाजी मारली असून त्यांना अडचणीत आणण्याची संधी सोडली नाही. मागील आठवडयात प्रबोधन डॉट कॉमच्या उद्घाटन प्रसंगी नव्या स्वरुपातील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अॅड प्रकाश आंबेडकर एकत्र आले. परंतू ते एकत्र येण्याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजगृहावर प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन शिवसेना ठाकरे गटात खळबळ माजवून दिली होती. त्यामुळे ठाकरे आंबेडकर एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.आणि आता तर एके काळची लढवयी संघटना दलित पॅथर आता शिंदे गटाला (बाळासाहेबांची शिवसेना) पाठींबा देणार असल्याचे मंत्री शंभुराजे देसाई यांनी जाहीर करणार असल्याचे सांगितल्यामुळे ठाकरे गटालापुन्हा एकदा धक्का देण्याचे तयारीत आहे.मात्र राजकीय जाणकारांच्या मते नामदेव ढसाळ यांच्या निधना नंतर कोणत्याही गटाची पँथर संघटना प्रभावी राहिलेली नाही.