Breaking News

भाजपा आमदार गोळीबार प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचा खोचक टोला, मोदींची गॅरंटी

मुंबई उपनगरातील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यानंतर गणपत गायकवाड यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी फोनवरून बोलताना गोळीबाराच्या घटनेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यामुळेच केल्याची कबुली दिली. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोप गंभीर असून त्यांच्याबरोबर गृहखातं ज्यांच्याकडे आहे त्या देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

विजय वडेट्टीवार यांनी एक्स मायक्रो ब्लॉगिंग या सोशल मिडीयावर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपातील काही मुद्दे ट्विट करत म्हणाले की, एकनाथ शिंदेनी उध्दव ठाकरे साहेबांसोबत गद्दारी केली, ते भाजपासोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत. एकनाथ शिंदेनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र फक्त गुन्हेगार पैदा होतील. महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहे. एकनाथ शिंदेंनी माझे करोडो रुपये खालले, त्यांनी आणि त्यांच्या खासदार मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपुढे या सर्व गोष्टी मी मांडल्या पण त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही….

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीतील आमदार गणपत गायकवाड यांचे हे शब्द ऐकून महाराष्ट्रातील जनतेला आज खालील गोष्टींची खात्री पटलेली आहे..

1. एकनाथ शिंदे आणि त्यांचे ४० आमदार हे गद्दार आहेत हे भाजपला देखील मान्य आहे

2. स्वतःचे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजपा आणि शिंदे गट एकमेकांसोबत पुढे सुद्धा गद्दारी करतील.

3. महाराष्ट्रात आज गुन्हेगार आणि गुंडांच राज्य आहे, त्यामुळे सामान्य माणसाला घाबरून गप्प बसण्यापलीकडे पर्याय नाही.

4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गुंडांची जी दादागिरी महाराष्ट्रभर सुरू आहे याची त्याची पूर्ण माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती असे खुद्द भाजप आमदार सांगत आहे तरी यावर कारवाई होत नाही.

सुसंस्कृत महाराष्ट्राचा महायुतीने युपी, बिहार करून ठेवला. सत्ताधारी आमदार पोलिस स्थानकात गोळीबार करत आहे, सत्ताधारी आमदार पोलिसांवर हात उचलत आहे, सत्तेचा माज, बंदूकीचा वापर, बदला हे सगळं आज महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे.

महाराष्ट्रात जे सुरू आहे तीच खरी मोदींची गॅरंटी आहे! अशी खोचक टीका करत

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा ?
सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. भाजपावाल्यांचे बॉस “सागर” बंगल्यावर आणि शिंदे गटाचे “बॉस” वर्षा बंगल्यावर बसून आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात..कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता! अशी टीका करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *