२००९ साली गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार येणार होते. पण त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना त्यांच्या सल्लागारांनी एका चुकीचे भाषांतर केलेल्या हिंदी वाक्य वापरायला लावले. त्या शब्दामुळे काँग्रेसची सत्ता आली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना माझे सांगणे आहे की, त्यांच्या सल्लागाराचा शब्द ऐकू नये नाही तर त्यांचा प्रश्न सुटणारच नाही असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जाहिररित्या दिला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असताना २००४ साली जो काही नरसहांर झाला. त्यानंतर २००९ सालच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसची सत्ता येणार होती. तसे वातावरणही निर्माण झाले होते. पण काँग्रेसच्या सल्लागारांनी शेक्सपिअरच्या नाटकातील एका पात्राच्या तोंडी असलेल्या संवादाचे भाषांतर केले. ते भाषांतर हिंदीत असे झाले की मौत का सौदा आणि हे भाषांतर त्यांनी सोनिया गांधी यांना वापरायला लावले. आणि तो शब्द मौत का सौदागर असा झाला. केवळ या एका शब्दामुळे काँग्रेसची येणारी सत्ता गुजरातमध्ये आली नसल्याचा गौप्यस्फोट केला.
पुढे प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, केवळ ती चुक सोनिया गांधी यांनी केली. तीच चुक मनोज जरांगे यांनी करू नये असा सल्ला देत तुमच्या सल्लागाराचे ऐकू नका असे आवाहन केले.
तसेच पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एक आठवण सांगताना म्हणाले, स्वातंत्र्यावेळी ब्रिटीशांनी एक आरक्षणासाठी जात निहाय यादी बनवली होती. ती नंतर पुढे कायम तशी पुढे ठेवण्यात आली. ब्राम्हण समाजातील किरवंत ही जात उत्तर भारतात उच्च वर्णिय म्हणून ओळखली जाते. तर ती त्यावेळच्या मद्रास प्रांतात अनुसूचित जातीतील म्हणून ओळखली जाते. पुढे हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ही केस आल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला स्पष्टपणे सांगितले की, तुम्हाला आरक्षण म्हणजे काय हेच कळलेले नाही. आम्ही घटनेत जी काही थोडीशी जागा ठेवली होती. तीच तुम्ही बंद करायला निघालात असे निक्षून सांगितले. त्या खटल्यात मराठा आरक्षणाचे उत्तर दडलेले आहे असेही सांगितले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षण असून काहीच प्रगती होत नाही. तर आरक्षण असल्यानेच आम्हाला पुढील शिक्षणाची दारे उघडली जातील असा एक भ्रम राजकिय मराठ्यांनी निर्माण करून ठेवला आहे. दरवर्षी ४० लाख विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था जर इथेच केली तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल आणि प्रगती होईल. पण महाराष्ट्रातील सत्ताधारी मराठ्यांनी आपल्या शैक्षणिक संस्था राहतील आणि त्याचा फायदा आपण सांगू त्यालाच होईल यासाठी दुसऱ्या संस्था होणार नाहीत यासाठीची काळजी घेतली. त्यामुळेच सत्ताधारी मराठे आणि रयतेतील मराठे असा नवा संघर्ष आता निर्माण झाला असून त्यातूनच ओबीसी आणि रयतेतील मराठा असा संघर्ष आपल्याला पहायला मिळत असल्याचेही सांगितले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आताचा रिंगमास्टर हा मोदी आहे. त्यामुळे त्याला वाटले तरच तो सर्वांना एकत्र येऊ देतो. आणि त्याला वाटले तर की आपली सत्ता जातेय तर तो कधीच एकत्र येऊ देत नाही. देशातील लोकशाही हटवून त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे सत्ता राबवायची आहे. त्यातूनच सध्या देशात जे काही सुरु आहे ते त्याच्याकडे असलेल्या यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणून सगळ्यांना एकत्र आणले आहे. जसे कामगार जर थेट सरकारशी जोडला असेल अर्थात भरतीतून तर तो सरकारची अर्थात संविधानाची बाजू घेईल. पण तुमच्या नोकऱ्यांचे कंत्राटी करण करून तुम्हाला कंत्राटदारांशी जोडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे तुम्हाला जगायचे असेल तर कंत्राटदार जे सांगेल तेच तुम्हाला करावे लागेल. नाही तर आहेच मनूनं सांगितली शिक्षा अशा पध्दतीने देशात पुन्हा गुलामगिरी छुप्या पध्दतीने आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे भाकित ही आरक्षणाच्या आणि कंत्राटीकरणाच्या निमित्ताने सुरु असल्याचे सांगितले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, हे जर होऊ द्यायचे नसेल तर आपल्याला संविधान वाचवावे लागेल. कारण जरी माझी आज प्रगती अर्थात बहुजनांची, मागासांची प्रगती झालेली नसली तरी आजच्या संविधानत ती संधी आहे. मात्र त्यांनी संविधानच बदलले तर ती संधी आपल्याला राहणार नाही. त्यामुळे संविधान वाचवावे लागणार आहे. तसेच ३ डिसेंबरच्या पाच राज्यांच्या निकालानंतर देशातील राजकिय परिस्थिती आणखी बिकट बनणार आहे कदाचित रक्तपातही होत राहतील अशी भीती व्यक्त करत दबावाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरु होईल अशी शक्यताही व्यक्त करत आपल्याला संविधानाच्या बाजूने उभे रहावे लागणार असल्याचेही महत्व अधोरेखित केले.