आजच्या संविधान महासम्मान रॅलीच्या निमित्ताने काही हौशींनी सांगितले की, तुम्ही ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर बोला. तुम्ही मंडलच्या बाजूने की, कमडंलूच्या बाजूचे असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मी आताच ओबीसी नेते छगन भुजबळ असो नाही तर प्रकाश शेंडगे यांना मी आत्ताच सांगतो की, माझ्या नादीला लागू नका. कारण तुम्ही ओबीसी आरक्षणाचा लढा आम्ही व्हि.पी.सिंगांच्या साथीने लढलोच. विषेश म्हणून तुम्ही कमंडलूच्या बाजूने असूनही आम्ही सोबत राहून हा लढा जिंकलोच ना असे सांगत ओबीसी आरक्षणावर पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले.
शिवाजी पार्क मैदानावर आयोजित संविधान महासन्मान महारॅलीच्या निमित्ताने आयोजित जाहिर सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी स्वातंत्र्यानंतरचा आरक्षण विषयीची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एक आठवण सांगताना म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानतर आणि भाषावार प्रांतरंचनेनंतर संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. त्यानंतर महाराष्ट्रातील तमाम जहागीरदार, सरदार आणि सरंजामदारांनी एकत्र येत यशवंतराव चव्हाण यांचा सत्कार केला. तो सत्काराचा प्रसंगही मोठा गंमतीशीर असून त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांना सोन्याच्या ताटातून जेवायला दिले अन् सत्कार करणाऱ्या आयोजकाने आपण वेगळे म्हणून चांदीच्या ताटातून जेवणं घेतलं. का तर म्हणे आपण रयतेचे मराठे आहोत म्हणून तर बाकिचे राजेशाहीतले मराठे म्हणून हा फरक करण्यात आल्याचा किस्सा सांगितला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आज नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हे देशातील संविधान बदलण्याचे बोलत आहेत. मात्र येथील परंपरागत ओबीसी हा त्यांच्या बाप जाद्यांकडून मिळालेले हिंदू धर्म सोडणार आहे का असा सवाल करत जर तो सोडत असेल तर त्याच्या आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. पण तो ते हिंदू्त्व सोडणार आहे का याचे उत्तर जाहिरपणे सांगण्याची गरज नाही तर तो प्रश्न त्याने स्वतःलाच विचारावा म्हणजे आरक्षणाचा प्रश्नही आपोआप संपेल. पण हिंदूत्वाच्या सोबत राहुन आरक्षणचा मुद्दा सुटू शकणार नाही असे भाकितही केले.