राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेने पाठोपाठ झालेल्या बंडखोरीची चर्चा अद्याप खाली बसायला तयार नाही. त्यातच पक्षाच्या बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा बंडखोरांच्या मतदारसंघातून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. मात्र गडचिरोली येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघेजण एकत्रितरित्या हजर होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल चढवित तोंडात अंजीर हातात खंजीर असलेल्यांचा काय भरवसा अशी टीका केली.
तसेच यावेळी शिवसेना (ठाकरे गट) चे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना घरात बसून सरकार चालविणारे आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना लोकांनी विचारणे बंद केले. काही जण घरात बसून काम करत होते. मात्र लोकांनी घरात बसून विकास कामे कऱणाऱ्यांपेक्षा लोकांमध्ये जाऊन कामे करणाऱ्याच्या मागे जाण्यापेक्षा त्यांनी आमच्यासोबत येण्याला प्राधान्य दिल्याची टीका केली.
यावर नाशिक जिल्ह्यातील येवला येथे आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद यांनी जाहिर सभे आधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री शाकाहारी असतील असे प्रत्युत्तर देत विषय संपविला.