शिवसेनेतील बंडखोरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली. शिंदे गटाने भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गटाची एकनाथ शिंदे गटाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिंदे गटावर कठोर टीका करताना दिसत आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या समर्थकांशी बोलताना म्हणाले, पैसा संपेल मात्र निष्ठा कोठून आणणार? निष्ठेचा झरा कोठूण आणणार आहात? ही निष्ठा फक्त शिवसेनेतच आहे. आपण संघर्ष करू असे सांगत संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले.
आपण ज्यांना मोठे केले ते गेले. सामान्य माणसांची ताकद माझ्यासोबत आहे. आज देखील (२२ ऑगस्ट) त्यांनी लाज, सज्जा सर्व सोडून दिली आहे, असे म्हणत त्यांनी बंडखोरांवर टीकेचे आसूड ओढले. ते मुंबईत समर्थकांना संबोधित करत होते.
सध्या महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सर्वसामान्यांच्या मनात चीड आहे. ज्या पद्धतीने ते आपल्याशी वागले आणि वागत आहेत ते हिंदुत्वाला साजेसे नाही. ते म्हणत होते की आम्ही हिंदुत्व सोडलं. पण त्यांनी लाज लज्जा सगळेचं सोडलेले आहे. त्यांना सत्ता म्हणजेच सर्वकाही असे वाटले होते. एकदा सत्ता आली की लोक जातात तरी कुठे, असे त्यांना वाटले होते. मात्र आता त्यांना मतदारसंघात जाणे अवघड झाले आहे. तुम्हाला काय कमी पडले होते, तुम्ही असे का केले? असे लोक त्यांना विचारत आहेत. या प्रश्नाला उत्तरं देताना त्यांच्या नाकीनऊ आले असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर त्यांनी टीका केली.
आगामी काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. याबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. सध्या आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यानंतर मीदेखील महाराष्ट्रभर दौरा करणार आहे. सध्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा दौरा सुरू आहे. यानंतर गटप्रमुखांचा मेळावा घेण्यात येणार आहे. बघता बघता दसरा मेळावा येणार असल्याचेही ते म्हणाले.
पैसा संपेल मात्र निष्ठा कोठून आणणार? निष्ठेचा झरा कोठूण आणणार आहात? ही निष्ठा फक्त शिवसेनेतच आहे. आपण संघर्ष करू. आपण ज्यांना मोठे केले ते गेले. सामान्य माणसांची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणूनच मला संकटांची चिंता नाही. पर्वा नाही, असेही त्यांनी सांगितले.