राज्यातील मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणूकांचा बिगुल कधीही वाजू शकतो. मात्र राज्यात सत्तांतर होत महाविकास आघाडीची सत्ता जावून बंडखोर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थानापन्न झाले. त्याच महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या अध्यक्ष पदी चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईच्या अध्यक्ष पदी आशिष शेलार यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. यापार्श्वभूमीवर भाजपाकडून आज मांटुगा येथील षण्मुखानंद हॉल येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र हा कार्यक्रम भलताच रंगला तो मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डॉयलॉगबाजी मुळे.
कार्यक्रमाच्या सुरवातीलाच आशिष शेलार हे भाषण करायला उभे राहिले तेव्हा शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांना अमिताभ बच्चन यांची उपमा देत म्हणाले, दिवार हा चित्रपट सगळ्यांना माहित आहे. या चित्रपटातील संवादही सगळ्यांमध्ये फेमस आहे. त्यानुसार बघायचे झाले तर देवेंद्र फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती है, असा डॉयलॉग ऐकविला. त्यावर उपस्थित भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हसून दाद दिली. तसेच महाभारतात जसे कृष्णाने आपल्या बुध्दी चातुर्याने कौरवांचा पाडव करण्यास मदत केली. तसेच फडणवीस हे कृष्णही आहेत. त्यामुळे त्यांनी आखलेल्या रणनीतीमुळे कौरवांमध्ये असलेले कर्ण अर्थात एकनाथ शिंदे हे ही आज आपल्याबाजूला आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस हे कृष्ण असल्याची सांगत फडणवीस यांना कृष्णाची उपमा दिली.
आशिष शेलार यांच्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांनी देखील याच डायलॉगबाजीची री ओढत स्वत: देखील शोले चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. मघाशी माझा उल्लेख झाला. हे मला अमिताभ बच्चन म्हणतात. माझं शरीर अमजद खानसारखं आहे आणि हे मला अमिताभ बच्चन म्हणतात अशी मिश्किल टिप्पणी यावेळी फडणवीसांनी केली.
मागे बसलेल्या आशिष शेलार यांनी शोले चित्रपटातल्या गब्बर सिंगचा “कितने आदमी थे” हा डायलॉग म्हणताच फडणवीसांनी त्यावर खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. हो, हे मी विचारू शकतो, कितने आदमी थे? ६५ मे से ५० निकल गए और सबकुछ बदल गया. लेकिन, अब दो ही बचे है..पण त्यांचाही सन्मान आहे. आम्ही विरोधकांचा सन्मानच करतो असे सांगायला मात्र फडणवीस विसरले नाहीत.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या रूपाने आपल्या सोबत आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना-भाजपा युतीचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही असा निर्धारही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर मागील वेळी आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत आपण ३५ वरून थेट ८२ वर पोहोचलो होतो. आता यावेळीही आपण सर्वाधिक जागा जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.