Breaking News

सुषमा अंधारे यांची टीका, …ही तर अदानी बचाव यात्रा देवेंद्र फडणवीस यांना समजत कसे नाही

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट हे दोन पक्ष राहुल गांधी विरोधात आक्रमक झाले आहेत. सावरकरांच्या सन्मानार्थ दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली. या गौरव यात्रेवरून विरोधकांकडून भाजपा आणि शिवसेनेवर टीका होऊ लागली आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गौरव यात्रेवरून भाजपावर टीका केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, ही सावरकर गौरव यात्रा नाही तर अदानी बचाव यात्रा आहे. गौतम अदानींवरून लोक प्रश्न विचारतील याची भिती वाटते म्हणून त्यांनी ही सावरकर गौरव यात्रा काढली आहे. भाजपाच्या लोकांमध्ये खरंच सावरकरांबद्दल प्रेम असेल तर नाशिकमधलं भगूर हे त्यांचं जन्मस्थळ आहे, त्याची दुरवस्था का झाली आहे? तिथे भाजपाने काय असे मोठे दिवे लावले आहेत. का तिथे मोठं स्मारक उभारलं नाही?
जर खरंच भाजपा नेत्यांमध्ये सावरकरांबद्दल प्रेम असेल आणि त्यांना सावरकर गौरव यात्रा काढायची असेल तर आधी त्यांनी गुजरातमधील अहमदाबादचं नामांतर सावरकर नगर असं करुन दाखवावं, असं आव्हान अंधारे यांनी दिले.

संभाजीनगरमधील दंगलीबाबत अंधारे म्हणाल्या की, संभाजीनगरमध्ये भाजपानं ठरवून महाविकास आघाडीच्या सभेत विघ्न आणण्यासाठी अक्षरश: संभाजी नगरमधील जनतेला वेठीस धरलं आहे. जनतेच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न भाजपानं जाणीवपूर्वक सुरू केला आहे असा आरोपही केला.

यावेळी सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना म्हणाल्या की, मला एक कळत नाही की देवेंद्र फडणवीस यांना या गोष्टी समजत कशा नाहीत की त्यांच्या हातातून सगळं सुटून चाललय असा उपरोधिक टोलाही लगावला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *