मागील दिड वर्षापासून ठाकरे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असताना त्यावर विधानसभाध्यक्षांनी वेळकाढू पणा केल्याचे दिसून येत आहे. तसेच लोकशाहीच्या प्रथेनुसार विधानसभा अध्यक्ष हे कधीही मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या घरी जात नाहीत. एखादे काम असेल किंवा काही आदेश द्यायचे असतील तर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण करतात. परंतु ज्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय विद्यमान विधानसभा अध्यक्ष देणार आहेत. आणि तेच जर एकदा नव्हे तर दोन वेळा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात असतील तर संशयाला वाव आहे असे सूचक वक्तव्य केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी अचानक भेटीसाठी गेल्याचे वृत्त बाहेर आले. विशेष म्हणजे आमदार अपात्रता प्रश्नी शिवसेना युबीटीने दाखल केलेल्या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. यापूर्वीही राहुल नार्वेकर हे आजारी असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी गेले होते. तसेच आमदार अपात्र प्रकरणी विधानसभाध्यक्ष नार्वेकर हे उद्या संध्याकाळी निकालाचे वाचन करणार असताना त्यापूर्वीच ही भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरातून आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे.
.या प्रश्नासह जागावाटपाच्या अनुषंगाने इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडत आहे. त्याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, मी ही राज्याचा चारवेळा मुख्यमंत्री होता. परंतु विधानसभेचे अध्यक्ष कधीही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात नाहीत. कारण विधानसभा अध्यक्षांचे पद हे एक प्रकारे स्वंतत्र पद आणि घटनात्मक पीठाचे पद आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही सांगायचे असेल किंवा काम असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विधानसभा अध्यक्ष आपल्या घरी किंवा कार्यालयात बोलावत असतात. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या हाती असताना तेच मुख्यमंत्र्यांच्या घरी गेल्याने उद्याच्या निकालानंतर संशयाला भरपूर वाव मिळेल असेही मत व्यक्त केले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेप्रकरणी सर्व स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यास अधिकचा उशीर करणे चुकीचे आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना उबाठा गटाचे आमदार रविंद्र वायकर आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या घरीही केंद्रीय यंत्रणांनी धाडसत्र सुरु केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला असता शरद पवार म्हणाले, केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी यांचे सरकार जोपर्यंत जात नाही. तोपर्यंत विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या घरावर अशा पध्दतीच्या धाडी अशाच पडत राहणार असल्याचे सांगितले.
याशिवाय दिल्लीत जागावाटप प्रश्नी होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने जागावाटपा प्रश्नावर काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक होत आहे. ही बैठक प्राथमिक स्वरूपाची आहे. या बैठकीला पक्षाचे प्रतिनिधी जितेंद्र आव्हाड हे गेले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीतच सर्व पक्षांचे जागा वाटप अंतिम होणार असे नाही. आणखीही बैठका होतील असेही स्पष्ट केले.
तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, देशातील सर्वाधिक जागा इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाकडे आहेत. तसेच यापूर्वीही त्यांनीच सर्वाधिक जागा लढविल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातही त्यांच्या पक्षाला जास्तीत जागा लढविल्या जातील अशी शक्यता वाटते. परंतु जागा वाटपावरून जरी वेगवेगळे लढावे लागले तरी आम्ही सर्वजण इंडिया आघाडी म्हणूनच निवडणूकीला सामोरे जाऊ असेही स्पष्ट केले.