मुंबईः प्रतिनिधी
राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेकडून थेट नव्याने निवडूण आलेल्या सरपंचांचे सरपंच दरबार मंत्रालयात आयोजित करण्यात आला. मात्र या दरबारात पत्नी सरपंचांबरोबर आलेल्या पती सरपंचाची गर्दी होवू लागल्याने अखेर पती सरपंचाना बाहेर काढण्याची पाळी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्यांवर आली. त्यामुळे सरपंच परिषदेसाठी आलेल्या सरपंच पतिराजांनी मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर गोंधळ घातल्याची घटना घडली.
महिला सरपंचाच्या पतीराजांनी आणि काही हौशी कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या आत प्रवेश मिळविला खरा मात्र मंत्रालयातील ६ व्या मजल्यावर असलेल्या सभागृहात पोहोचले. तर आत आधीच गर्दी झाल्याचे चित्र सर्वांना पाह्यला मिळाले. त्यात आणखी येत असलेल्या सरपंच पतीराजांनी आणखी गर्दी केल्याने फक्त सरपंच वगळता त्यांच्यासोबत आलेल्या सरपंच पतीराज आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. अखेर पतीराजांना आत सोडल्या जात नसल्याने या सरपंच पतीराजांनी काही वेळ मंत्रालयातील ६ व्या मजल्यावर गोंधळ घातला.
सरपंच पतीराजाचा वाढता गोंधळ पाहून खुद्द ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आतमधून निरोप पाठवून महिला सरपंचाच्या पतीराजांनी माझ्या केबिनमध्ये बसावे असे सांगितले. त्यानंतर सभागृहा बाहेर असलेल्या पोलिसांनी या गोंधळ घालणाऱ्या पतीराजांना तेथून बाहेर काढले.
वास्तविक पाहता राज्यातील नवनिर्वाचित आणि पूर्वीच निवडून आलेल्या १५० सरपंचाना या दरबारासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात २०० सरपंच आल्याने सभागृहात जागा अपुरी पडायला लागली. त्यामुळे सरपंच पतिराजांना बाहेर काढण्याची कारवाई केल्याचे ग्रामविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.