Breaking News

राफेलचे सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव देण्याचे शरद पवारांचे आश्वासन

बुलढाणा : प्रतिनिधी

देशात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यावर शेतकर्‍यांचा प्रश्न जसा तातडीने सोडवणार आहोत तसाच या राफेलची सखोल चौकशी करून यातील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नसल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथील जाहीर सभेत दिले.

आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार म्हणजे देणारच शिवाय उत्पन्नाच्या दिडपट हमीभाव देवू… आम्ही नुसत्या घोषणा करत नाही… यापुर्वीही कर्जमाफी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड नाही म्हणजे नाही असा शब्दही त्यांनी यावेळी दिली.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची आज जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आमदार जोगेंद्र कवाडे, खासदार माजिद मेमन, उमेदवार आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर, कॉंग्रेसचे नेते मुकुल वासनिक,रमेश बंग, रेखाताई खेडेकर, साहेबराव सत्तार आदींसह मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मोदींची हुकुमशाही ते चौकीदार चोर है पर्यंतचे मुद्दे आपल्या भाषणात घेताना मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. लोकशाहीची चौकट मोडू पाहणार्‍या मोदींवर टीकास्त्र सोडतानाच परिवर्तन करण्यासाठी आणि मोदी सरकार घालवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन करत मी तुमच्यातील माणूस आहे हे लक्षात घ्या. दहा वर्ष त्या खासदाराला संधी दिलात मला फक्त ५ वर्षे संधी द्या तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही अशी ग्वाही उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तर आमदार जोगेंद्र कवाडे यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कॉंग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांनीही मोदी व फडणवीस सरकारवर टीका करताना संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आल्यावर शेतकर्‍यांना कर्जमाफी देणार असल्याचे सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *