अकोला-चिखली: प्रतिनिधी
यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी या जिल्ह्यांना कायम मागास ठेवले आणि त्यामुळे या जिल्ह्यांच्या विकासाकडे अतिशय गांभीर्याने आम्ही लक्ष देत आहोत आणि या दोन्ही जिल्ह्यात अनेक प्रकल्पांसाठी भरीव निधी दिला जात असल्याचे सांगत मागास जिल्ह्यांच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार खा. संजय धोत्रे तसेच बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ अनुक्रमे तेल्हारा आणि चिखली येथे दोन प्रचारसभांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. विदर्भात उन्हाचा पारा कायम असतानाही दोन्ही प्रचारसभांना प्रचंड गर्दी ही भाजपा महायुतीच्या विजयाची साक्ष देणारी होती. या सभांना मंत्री रणजित पाटील, चैनसुख संचेती तसेच स्थानिक नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
केंद्रातील आणि राज्यातील सरकार शेतकरी आणि गरिबांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करते आहे. सर्वांना घरे, आयुष्मान भारतच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा, पाणी आणि सिंचन इत्यादींसाठी सरकार अतिशय गांभीर्याने काम करते आहे. एकट्या अकोला जिल्ह्यातील विचार केला तर शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक विमा आणि थेट मदतीच्या माध्यमातून १२२७ कोटी रूपये देण्यात आले आहेत. यापूर्वी ही मदत अवघी ४२१ कोटी रूपये इतकी होती असे ते तेल्हारात येथील सभेत बोलताना सांगितले.
चिखली येथे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांइना कर्जमाफीसह विविध मदतीपोटी २६०९ कोटी रूपये ४ वर्षांत देण्यात आले, जे पूर्वी अवघे २५५ कोटी रूपये होते. बुलढाणा जिल्ह्यात भारतीय जैन संघटनेच्या मदतीने जलयुक्त शिवारची मोठी कामे करण्यात आली आहेत. सिंदखेडराजा मातृतीर्थ येथे विकासाची मोठी कामे होत आहेत. वर्षोनुवर्षे मागास राहिलेल्या या जिल्ह्यांचा विकास ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे.