सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल अद्यापही न आल्याने राजकीय पेच कायम आहे. सत्तासंघर्षांबाबतच्या याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे लवकर सुनावणी व्हावी, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सुनावणीबाबतची अनिश्चितता कायम असल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्ष लागण्याची शक्यता नाही असं त्यांनी रत्नागिरीत जाहीर सभेत बोलताना जाहिर केले. त्यांच्या या विधानाने राजकिय वर्तुळात एकच खळबळ माजली.
भरत गोगावले म्हणाले, आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत. धनुष्यबाण आमचाच आहे, ७ तारखेला आम्ही तुम्हाला दाखवतो. या लोकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. अपात्र होतील सरकार कोसळेल याची वाट पाह होतो. पण मी आज सांगतो, घटनापीठाकडे गेलेल्या तक्रारीवर चार ते पाच वर्ष निकाल येणार नाही. यानंतर २०२४ ची निवडणूक आपण जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वासही व्यक्त केला.
आम्ही ४० आमदार, अपक्ष आणि १२ खासदार बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्याचं, वाढवण्याचं, हिंदुत्व पुढे नेण्याचं काम करतोय, त्यामुळे आम्ही गद्दार होऊ शकत नाहीत असेही ते म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले, थोरे म्हणाले जी काही शिल्लक शिवसेना आहे, त्यांनी त्यांचं बघाव, बाळासाहेबांची खऱी शिवसेना आम्ही आहोत. १९६६ ला स्थापन झालेल्या या पक्षाचा आता वटवृक्ष झाला आहे. हा वटवृक्ष सुकायला लागला की काय असं वाटलं तेव्हा आम्ही उठाव केला असे सांगितले.
भरत गोगावले यांनी यावेळी पुन्हा एकदा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या सत्ताधारी आमदारांसोबत झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला. ते म्हणाले ‘तीन दिवस ते घसा फोडून ‘५० खोके, एकदम ओके’ ओरडत होते. जेव्हा आम्ही आमच्या स्टाइलने उत्तर दिलं तेव्हा ते गर्भगळीत झाले. ‘लवासाचे खोके, बारामती ओके’, ‘अनिल देशमुखचे खोके, बारामती ओके’ ‘अनिल परबांचे खोके, मातोश्री ओके’ अशा घोषणा आम्ही दिल्या, काय चूक केलं? म्हणून आमचा नाद करायचा नाही असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
आम्ही त्या मिटरकरीला तुझी पिटकरी करून टाकेन सांगितलं. ७ तारखेला धनुष्यबाण निशाणी आम्ही घेऊ असा निर्धारही व्यक्त केला.