जालना येथील आंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी उपोषणाचे आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या उपोषणाच्या आंदोलनाचा आज १४ वा दिवस असून आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार आणि पाणीही त्यागले आहे. त्यातच राज्य सरकारने दोन वेळा सुधारणा केलेल्या राज्य सरकारचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळून लावला. त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती जालन्याबरोबरच महाराष्ट्राच्या अन्य भागात पसरत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षिय बैठक बोलावली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन तीव्र होत असतानाच ओबीसी समाजाकडूनही आमच्या वर्गातील आरक्षण काढून मराठा समाजाला देऊ नका अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाचा आरक्षणात समावेश करू नका अशीही मागणी करण्यात येत आहे.
या सगळ्या घडामोडींवर अजित पवार म्हणाले, ओबीसी समाजही मराठा समाजाला आमच्यातून आरक्षण देऊ नका अशी मागणी करत असल्याचे वृत्त माझ्या वाचण्यात आले आहे. त्यामुळे समाजातील कोणत्याही घटकाच्या आरक्षणाला धक्का न लावला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरील चर्चा झाल्यानंतर ठरवल्याचे सांगितले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ही बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्व पक्षांची म्हणणे जाऊन घेणार असल्याचे सांगत तो अधिकार मुख्यमंत्र्यांना जाऊन घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान, कोल्हापूर येथील उत्तरदायित्व या सभेला जाण्यापूर्वी अजित पवार हे कराड येथील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जात अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना वरील माहिती दिली.