राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडाळी करत शरद पवार यांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल पाटील, धर्मराव आत्राम यांना सोबत नेत थेट मंत्री पदाची शपथ दिली. याशिवाय प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरे, संजय बन्सोड, धनंजय मुंडे यांना हे अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जात आहेत. अजित पवार यांच्यासह ९ जणांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारवाईचा बडगा उगारला असताना अजित पवार यांच्यासह ज्या ९ जणांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे विधान केले असून ज्या आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली इतर जे गेले, त्यांच्यासाठी काही काळ वाट पाहणार असल्याचे सांगत ते जर आले नाहीत तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.
अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पवारसाहेबांना आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
जयंत पाटील म्हणाले, येत्या ५ जुलै रोजी पवारसाहेबांनी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल अशी खात्री व्यक्त करतानाच पवारसाहेबांसोबत असणारा, पवारसाहेबांना पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी असेल असे स्पष्ट केले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. ९ आमदार सोडले तर सर्व आमदार अद्याप आमच्यासोबत आहेत. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
याशिवाय जयंत पाटील सांगितले की, ज्याक्षणी ९ आमदारांनी शपथ घेतली त्याचक्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांचीशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षाही व्यक्त केली.