बारसू रिफायनरी प्रकल्पाला होत असलेल्या स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने सत्ताधारी मंत्र्यांकडून तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला बारसू जागे संदर्भात पाठविलेल्या पत्राचा दाखला देण्यात येत आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी बारसू आणि सोलगांव येथील स्थानिकांशी संवाद साधला. त्यानंतर महाडमध्ये झालेल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर उध्दव ठाकरे यांनी जोरदार टीका करत पंतप्रधान मतदारांना ‘बजरंग बली की जय’ म्हणा सांगतात, मग तुमचे बळ आणि ५६ इंचाची छाती कुठे आहे? असा सवाल मोदींना केला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिले.
भाजपाचे नेते तथा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना म्हणाले, राज्याचे स्वघोषित कुटुंबप्रमुख असलेले उद्धव ठाकरे वेळ आली की मैदान सोडून घरात बसतात. मात्र, आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘जय बजरंग बली’ विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी हिंदुत्त्व गुंडाळणारे आज ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणा असं सांगतात. मात्र, ते स्वत:च्या हिंदुत्त्वाबाबत कधीही बोलत नाहीत, असा टोलाही लगावला.
काल उद्धव ठाकरे यांनी महाडमधील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीका करताना म्हणाले, आज पंतप्रधान मतदारांना ‘बजरंग बली की जय’ म्हणा सांगतात. मग तुमचे बळ आणि ५६ इंचाची छाती कुठे आहे? त्यामुळे यापुढील प्रत्येक निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत भाजपाला तडीपार करा, असे आवाहन केले.
राज्याचे स्वघोषित कुटूंबप्रमुख @UdhavThackeray, वेळ आली मैदान सोडून घरात बसणारे, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "जय बजरंग बली"वर प्रश्न उभे करतायत. मविआ बरोबर हिंदुत्व गुंडाळून टाकून देत, खुर्चीच्या मागे जाणाऱ्यांना आता 'जय भवानी,जय शिवाजी' म्हणा सांगताना स्वःताच हिंदुत्व सोडल…
— Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) (@keshavupadhye) May 7, 2023
तसेच उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्व सोडलं या शिंदे गटाच्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं. “उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, अशी बोंब ठोकली जाते. मात्र, आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितलंय, ‘मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेकी आणि देशद्रोह्यांना बडवणारा हिंदू पाहिजे,’ असा पलटवारही उध्दव ठाकरे यांनी केला.