बरोबर एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय दिला. तसेच संबंधित आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देत ९० दिवसात त्यावर निर्णय घेण्याची कालमर्यादा घालण्यात आली. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटासह ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्रतेची नोटीस पाठवत अंतिम निर्णयाची प्रक्रिया सुरु केली. त्यावर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
यापार्श्वभूमीवर आजपासून विदर्भ दौऱ्यावर असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख्य उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त करताना, जर कोणी चौकटीबाहेर निकाल दिला तर आमच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे उघडे असतील असे सांगत सूचक इशारा दिला.
आज यवतमाळच्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या चौकटीतच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी न्यायालयाच्या चौकटीबाहेर निर्णय दिला तर तो लोकशाहीला धरुण नसेल. असं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आमच्यासाठी उघडे असतील, असा इशारा दिला.
तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, त्याचा काहीही अर्थ काढायचा प्रयत्न केला तरी सर्वोच्च न्यायालयाने जो अर्थ काढून दिला आहे, त्याच्या पलीकडे कुणालाही जाता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांत निकाल दिला आहे. त्या निकालाच्या चौकटीतच विधानसभा अध्यक्षांना (राहुल नार्वेकर) निर्णय घ्यावा लागेल.
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीबाहेर निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर ते लोकशाहीला धरुण होणार नाही आणि तसं अध्यक्ष वागतील, अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. त्यांनी जर तसा निर्णय घेतला, तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आमच्यासाठी तेव्हाही उघडे असणारच आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो, असेही स्पष्ट केले.