मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणूका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेत केलेल्या बंडखोरीमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात अद्यापही रोष आहे. जनतेतील हो रोष कमी कऱण्याच्या उद्देशाने आणि आगामी निवडणूकीत शिंदे गटाला आणि भाजपाला निवडणूका सोप्या जाव्यात या उद्देशाने दसरा आणि दिवाळीचे औचित्य साधत राज्यातील १ कोटी ७० लाख रेशन कार्ड धारकांना १०० रूपयात दिवाळी फराळाच्या वस्तु देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५१३ कोटी २४ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
राज्य सरकारकडून जाहिर करण्यात आलेल्या या दिवाळी भेटीचा परिणाम राज्यातील जनतेवर कितपत होणार हे येणाऱ्या निवडणूकांच्या निकालानंतर दिसून येईल.