प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्रित आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्या जनतेचे लक्ष लागू राहिले होते. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, त्यांना आता सगळंच हवं आहे. इतकेच नव्हे तर न्यायालयालयावरही त्यांनी बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना सगळंच बुडाखाली घ्यायचं आहे असा उपरोधिक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावत प्रकाशजी आपल्या दोघांना मिळून आता ही गोष्ट करावी लागेल असे सांगत अप्रत्यक्षरित्या आगामी निवडणूकीच्या निमित्ताने साद प्रकाश आंबेडकर यांना साद घातली.
त्यांना येनकेन प्रकारे सत्ता हवी आहे. हे हवंय ते हवयं आणि सगळंच हवंय. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली आहेत. मात्र या ७५ वर्षात राज्यघटनेवर आधारीत किती कारभार केला आणि किती केला नाही हे तपासून बघायची वेळ आली आहे. आता तर देशात राज्यघटना सोडूनच राज्य कारभार सुरु असल्याची टीकाही त्यांनी मोदी सरकारचे नाव न घेता केली.
यावेळी उध्दव ठाकरे बोलताना म्हणाले, त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे हताश होऊन बसले असते तर आज जी काही परिस्थिती आहे ती आपण पाह्यली नसती. त्यांनी धाडस दाखविले म्हणून या समाजाला प्रगतीची दारे उघडी झाली. समाज जागृत झाला. शिवसेनेतही अनेक शाखाप्रमुख आहेत, आमदार आहे, मंत्री झाले पण कधी या सर्वांना त्यांची जात कोणती असा प्रश्न विचारला गेला नाही असेही स्पष्ट केले.
डॉ.बाबासाहेबांनी अस्पृश्यतेची चटके सहन केले तर प्रबोधनकारांनी ते पाह्यले म्हणून ते समाजाचे प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रबोधनकार यांनी चुकीच्या गोष्टीवर नेहमीच आसूड ओढले. त्यामुळेच अनेक चुकीच्या गोष्टी उजेडात आल्या ते तसलं हिंदूत्व आमचं नाही असा पुर्नरूच्चार त्यांनी केला.
प्रबोधनकार आता या संकेतस्थळाच्या माध्यमातून पुन्हा लोकांमध्ये आले आहेत. त्यामुळे ते वाचता वाचता अनेकांना प्रबोधनकार भेटतील. माझं उलटं आहे आधी भेटत राहिले अनं आता भेटता भेटता वाचत राहिलो असा प्रकार माझ्याबाबत घडल्याचेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.
दरम्यान भाषणाच्या सुरुवातीला उध्दव ठाकरे म्हणाले की, मी आणि प्रकाशजी आम्ही बोलत नाही असे नाही. आम्ही बोलत असतो अधून मधून भेटतही असतो. मात्र त्यांना भेटायचं म्हणलं की पुरेसा वेळ लागतो. त्यांना भेटलं की माहिती आणि ज्ञानाच्या खजिन्याचं दार उघडं होतं. मात्र आज मंचावर पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलोय असे सांगायला विसरले नाहीत.