सध्या देशातील वातावरण बरेच बदलले आहे. सध्याचा वाद हा धर्मातील असून हा धर्म म्हणजे एक आहे तो म्हणजे संत परंपरा आणि दुसरा म्हणजे वैदिक धर्म यातील आहे. संत परंपरेत लोकशाही आहे तर वैदिक धर्मात हुकुमशाही आहे. एकाबाजूला विधवांचे मुंडन आहे तर दुसऱ्या बाजूला विधवांचा पुर्नविवाह आहे. त्यामुळे सध्या सुरु आहे ते या पध्दतीने सुरु आहे. संतपरंपरेत लोकशाही असल्याने ती सर्वसमावेशक आहे. मात्र वैदिक परंपरेत तसे नाही. त्यामुळे आपल्याला निवडावे लागेल की आपणाला मतदार म्हणून लोकशाही हवी की हुकूमशाही हवी अशी विचारणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.
तसेच या दोन्ही धर्मातीत असलेली जी काही व्यवस्था आहे ती इन्बिल्ड असून ती व्यवस्थाच त्या त्या गोष्टींचे रक्षण करत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे एकाच मंचावर आले होते. यावेळी या दोघांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सध्याचा वाद हा दोन धर्मातील नाही. अनेक म्हणतात मुस्लिम धर्मामध्ये लोकशाही नाही तर हुकुमशाही आहे. जशी ती मुस्लिम धर्मात आहे तशी ती वैदिक धर्मातही आहे. मात्र वैदिक धर्मापासून वेगळा असलेल्या संत पंरपरेत मात्र हुकूमशाही नाही. देशात लोकशाही आहे. मात्र आता ती हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी आता सारे प्रयत्न होताना दिसत असल्याचेही स्पष्ट केले.
आज दोघेही आम्ही एकाच मंचावर असलो तरी राजकिय भूमिका काय घ्यायची आहे ती घेऊ. पण इथून पुढील काळात फक्त राजकिय पक्षांनी भूमिका घेऊन नाही भागणार तर मतदार म्हणून तुम्हाला आणि सर्वांनाच ठरवावे लागेल की, आपल्याला हुकूमशाही हवी आहे की लोकशाही. लोकशाही जर स्विकारली तर हा जो आपला समाज आहे त्या समाजातील छोट्या छोट्या घटकांना सत्तेत सहभाग नोंदविता येईल आणि तो सत्ता उपभोगेल असे मतही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मागील काही दिवसांपासून आम्ही अध्यक्षीय राजवट आणू म्हणून काहीजण बोलत आहेत. मात्र अध्यक्षीय राजवटीच्या माध्यमातून एकप्रकारची हुकूमशाहीच ते आणू पहात आहेत. मात्र अध्यक्षीय राजवट आणून हा जो समाज आहे ज्या समाजात छोटे छोटे घटक आहे ते सत्तेच्या लाभापासून वंचित राहतील आणि त्याचा फटका आपणा सर्वांनाच बसेल अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.