Breaking News

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार देणार

बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून या माध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेतील करारातूनही २ लाख तरूणांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिरास शिंदे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.पकंज जावळे, कौशल्य विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त सुनिल सैंदाणे, जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

राज्यात नागपूर, लातूरनंतर अहमदनगर येथे नमो विभागीय रोजगार मेळावा होत आहे. असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व विभागात रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार मिळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार असल्याचे सांगितले.

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रशिक्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीमुद्रीत दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले की, राज्य शासन सातत्याने कौशल्य विकासावर भर देत आहे. राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला. ३४ जिल्ह्यातील २५० तालुक्यातील ५११ गावात या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी ५० हजार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. उद्योग व रोजगारक्षम युवा यांच्या संवादातून सुद्धा अनेक संधी निर्माण होत असतात. रोजगार मिळणे हे कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते. या रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला गुणवत्तेनुसार, कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल. हा नमो महारोजगार मेळावा अनेक युवक-युवतींना आपल्या पायावर उभा करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्ह्यात दोन ठिकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधिनी सुरू करणार– कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री लोढा म्हणाले की, पंधरा दिवसांच्या आत राहाता (शि‍र्डी) व अहमदनगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधिनी सुरू करण्यात येईल. एक महिन्याच्या आत अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करुन युवकांना १५ दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.

जिल्ह्यात २३ हजार रोजगार निर्माण होणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, औद्योगिकरणाच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन अहमदनगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आली. ५ हजार १४ कोटींच्या सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. अहमदनगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे‌. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारा मिळण्यासाठी प्रयत्न आहे. प्रवरेत पंचवीस वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. अशी आठवणही त्यांनी यावेळी काढली. या रोजगार मेळाव्यात १२ हजार तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राच्या पहिल्या निर्यात सुविधा केंद्राचे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा गुंतवणूक परिषद सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या व देवाणघेवाण अहवाल प्रकाशित करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध उद्योजक उपस्थ‍ित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही युवक-युवतींना ॲप्रेंटीसशिप नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले. कौशल्य विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त सुनिल सैंदाणे यांनी आभार मानले.

विभागीय रोजगार मेळाव्यास तरूणांचा उदंड प्रतिसाद

भिस्तबाग महल शेजारील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात आल्या. या रोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी पाच जिल्ह्यातील सुमारे ६५ हजार तरूणांनी सहभाग घेत मेळाव्याला उदंड प्रतिसाद दिला. महारोजगार मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक कंपन्या व आस्थापनांनी सहभागी झाल्या आहेत.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *