Breaking News

अंबादास दानवे यांचा टीका, राज्यातील आरोग्यव्यवस्था मरणपंथाला

नांदेड, कोल्हापूर, संभाजीनगर, ठाणे व कळवा येथील शासकीय रुग्णालयात औषधं व डॉक्टरांअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला,या घटना राज्याला लाज वाटेल अशा आहेत. असे म्हणत राज्यातील आरोग्य व्यवस्था मरणपंथाला आली असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

अंबादास दानवे म्हणाले, खासगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची घोषणा सरकारने केली, मात्र पैशांअभावी उपचारच होत नाही. महात्मा ज्योतिबा फुले योजना खासगी रुग्णालयात राबविण्यासाठी सरकारी अधिकारी एका रुग्णाच्या बेडमागे एक लाख रुपये घेत असल्याची माहिती सभागृहात आणली.

वैद्यकीय उप संचालकांची पद रिक्त का आहेत? या विषयाचे उत्तर सरकारने देणं गरजेचं असल्याचे दानवे म्हणाले.

अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले, एमपीएससीच्या माध्यमातून १४ वैद्यकीय संचालक पद भरली गेली त्यांची क्षमता असूनही त्यांना साईड पोस्टिंग दिली गेली. राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात ३४ सिव्हिल सर्जनची पद रिक्त असताना त्यात १२ कनिष्ठ सिव्हिल सर्जन हे त्या नियमात बसत नसतानाही त्यांना नियुक्त केले गेले. डॉ.प्रताप सारणीकर जिल्हाधिकारी यादीत १११ क्रमांकावर असताना उपसंचालक यादीत नाव नसतानाही त्यांना २ टप्पे ओलांडून सहसंचालक पदी नेमणूक देण्यात आली. वाशीम, बुलढाणा जिल्ह्यात सिव्हील सर्जन कॅडरचे नसलेले डॉक्टर भरती केले गेले. आरोग्य विभागाने १०८ नंबरच्या नवीन रुग्णवाहिकांसाठी १० वर्षांसाठी ९ हजार कोटी रुपयांच निविदा काढली गेली, या गैरव्यवहाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. १०८ क्रमांकाच्या ९३७ रुग्णवाहिका या मोफत सेवा देत असताना त्यांची सध्याची स्थिती काय आहे, याबाबत सरकारने उत्तर द्यावे अशी मागणी केली.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, जिल्हा रुग्णालयात रुग्ण मरण पंथाला येतात त्यावेळी डॉक्टर त्यांना औषध घेण्यासाठी प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. आपण त्या डॉक्टरांवर कारवाई करतो, मात्र औषध खरेदी न करणाऱ्यांवर कारवाई करत नाही. नांदेडमधील जिल्हा रुग्णालयात एका महिलेने ७० हजार रुपयांच सोनं नाण विकून औषधे आणली, मात्र तिचं बाळ वाचू शकलं नाही. त्या महिलेच शाप या सरकारला लागेल अशी भावनाही व्यक्त केली.

तसेच पुढे बोलताना सरकार स्वतःच्या जबाबदाऱ्या न ओळखता विरोधी पक्ष व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्यात वेळ घालवितात, अशी टीका दानवे यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *