महाराष्ट्रापाठोपाठ, झारंखडचे मुख्यमंत्री सोरेन, दिल्लीतील आम आदमी पार्टीचे उपमुख्यमंत्री, पश्चिम बंगाल मध्ये तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बँनर्जी, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या आमदारांवर विविध यंत्रणांकडून दबाव आणत त्यांचे सरकार अस्थिर करण्यात आले. पैकी दिल्लीचे आम आदमी पार्टीचे नेते तथा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांची प्रदीर्घ चौकशी करून अटकेची कारवाई केली. त्यानंतर आज देशभरातील ९ राजकिय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असून यंत्रणांची विश्वासर्हाता कमी होत असल्याचा आरोप केला. या पत्राबाबत सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, तपास यंत्रणाच्या गैरवापराबद्दल पत्र लिहून विरोधकांची सुटका होणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील केंद्रीय तपास यंत्रणांचा कुठल्याही प्रकारे गैरवापर होत नाहीए. जे लोक गैरकारभार करतात, भ्रष्टाचार करतात, त्यांना शिक्षा देण्याचे काम वेगवेगळ्या यंत्रणा करीत आहेत. यात राजकीय हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही.
कलवार कलाल समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी त्यांचे आज अमरावतीत आगमन झाले होते. कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली.
तपास यंत्रणा स्वतंत्रपणे काम करीत आहेत, त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, त्यांची चौकशी थांबविण्यात आली, हा आरोप खोटा आहे. विरोधकांनी तसे उदाहरण दाखवून द्यावे. कुणी भाजपामध्ये आले, म्हणून त्यांची चौकशी बंद होत नाही. कुणावर जर चुकीची कारवाई झाली, तर त्यांना न्यायालयात दाद मागता येऊ शकते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशभरातील विरोधी पक्षातील ९ मोठ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले. यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. सीबीआय तसेच ईडी या तपास यंत्रणांचा विरोधकांविरोधात वापर होत असल्याचे सांगत भाजपावर टीका करण्यात आली आहे. यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांची नवे आहेत. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचादेखील समावेश आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आरोपी पकडण्यात आले आहेत. संदीप देशपांडे यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत, त्याविषयी पोलीस तपास करीत आहेत, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.