दिवसभर सुनावणी पार पडल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे नाकारले आहे. मात्र हा अंतिम निर्णय आहे असे वाटत नाही. आता निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा हे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित दिसते असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
निवडणूक आयोग आपली कार्यवाही सुरू करेल, परंतु निवडणूक आयोग काय निर्णय घेतो यावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाअगोदर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही असेही ते म्हणाले.
तुम्ही निवडणुक चिन्ह गोठवण्याबाबत विचारत आहात परंतु निवडणूक आयोग वेगळा विचार करु शकते त्यामुळे काय होणार आहे आणि देशात काय सुरू आहे हे माहीत आहे असेही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.
आमच्या सरकारच्यावेळी राज्यपालांचा वेगळा मूड होता आणि आता त्यांचा वेगळा मूड आहे. त्यानुसार सरकार धोरण बदलत आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
इंजिनिअर आणि ॲग्रीकल्चर पदवीधर सेलची येत्या महिनाभरात स्थापना
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इंजिनिअर आणि ॲग्रीकल्चर पदवीधर सेल या दोन सेलची स्थापना करण्याचा निर्णय आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.
इंजिनिअर सेलच्या माध्यमातून राज्यातील इंजिनिअर तरुणांना संघटीत करण्याचे काम होणार आहे तर राज्यात लाखो ॲग्रीकल्चर पदवीधर असून त्यांना एकत्रित करून शेतीतील नवीन ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा निर्णय झाला.
येत्या महिनाभरात या दोन्ही सेलची प्रत्येक तालुक्यात संघटना बांधणीचे काम राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.