आगामी महापालिका निवडणूका आणि त्यानंतर होणार असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय धोरण ठरविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक नाशिक येथे पार पडली. या बैठकीत पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप करताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने भाजपा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. आपल्याला कारागृहात टाकण्यासाठी जंग जंग पछाडले होते. पण, ते काही करु शकले नाहीत. ज्यांना ही जबाबदारी दिली, तेच कारागृहात गेले, असा आरोप केला. याला आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले असून कोठे तरी काही तरी घडलं असावं म्हणून फडणवीसांच्या मनात अटक होण्याची भीती निर्माण झाली अशा खोचक शब्दात फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
भास्कर जाधव हे आज ठाणे शहरात आले असता प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधीनी फडणवीसांच्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.
तसेच पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, त्यांच्या विधानाला फार महत्व देण्याची गरज नाही. पण, कुठंतरी काहीतरी घडलं असावं, म्हणून फडणवीसांच्या मनात अटक होण्याची भिती निर्माण झाली आहे. फडणवीसांनी काही चूक किंवा गुन्हा केला आहे का? फडणवीसांच्या अटकेची कुठेही चर्चा नाही. फडणवीसांनीच मुद्दा उपस्थित केल्याने, काय खरं काय खोटं हे महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे असे आवाहनही केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ आणि विधानसभेच्या २०० जागा जिंकण्यासाठी भाजपाने महाविजय २०२४ अभियान शनिवारी जाहीर केलं. यावर भास्कर जाधव यांना विचारलं असता, ते म्हणाले, समाजात वेगवेगळे आकडे फेकून संभ्रम निर्माण करायचं हे भाजपाचं नियोजन आहे. आमच्या पक्षाशिवाय कोणीची नाही, असं वातावरण निर्माण करतात. ही भाजपाची जुनी सवय आणि खोड आहे. एवढीच हिंमत असेल तर मुंबई, ठाणे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊन दाखवाव्यात. त्यांचं पानीपत ठरलं आहे, असे भाकितही केले.