मागील दोन-तीन दिवस प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ऑन कॅमेराच दोन-तीनदा थुंकले. त्यामुळे राऊत यांच्या थुंकण्यावरूनची चर्चा चांगलीच राजकिय वर्तुळात रंगली आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांना त्या थुंकन्यामागचे कारण विचारले असता ते ते म्हणाले, माझ्या जीभेला त्रास होतो. शस्त्रक्रिया झाल्याने दात जीभेला लागतो. त्यामुळे मला बोलता बोलता थुंकावं लागलं. त्याचा माध्यमं वेगळा अर्थ काढत आहेत.
तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मी त्यांच्यावर थुंकलो नसलो, तरी हे खरं आहे की, जनता त्यांच्यावर थुंकत आहे. हा सर्व प्रकार महाराष्ट्राने त्यांच्यावर थुंकण्याचाच प्रकार आहे. भविष्यात महाराष्ट्र त्यांच्यावर कसा थुंकतो हे सर्वांना दिसेल. माध्यमांनी त्याचा संबंध माझ्याशी जोडू नये असे आवाहन करायलाही राऊत विसरले नाहीत.
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात धार्मिक वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी आज त्र्यंबकेश्वर दौरा केला. मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदू खतरेमध्ये नसून नेते खतरेमध्ये असल्याचं म्हटलं आहे.
बेईमान जाऊन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात यापेक्षा मोठं दुर्दैव काय? उद्याच्या निवडणुकीत यांचं पानिपत होणार आहे. निवडणूक महापालिकेची असो किंवा विधानसभा, लोकसभा असो हे निवडणूक हरणार आहेत. आज त्यांना काम मिळतंय त्यांना चांगली प्रसिद्धी द्या. त्यांची बेईमानी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. जोडे मारण्याच्या कार्यक्रमाने खऱ्या शिवसेनेवर काहीही परिणाम होत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मी वीर सावरकरांचा भक्त आहे. लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे यांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. चीड आणि संताप कोणत्याही प्रकार व्यक्त होऊ शकतो. मी थुंकलो कुठे मला दाखवा. माझा दाताचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यातून व्यक्त झालेली कृती आहे. त्यांना असं वाटतं आहे की लोक आमच्यावर थुंकत आहेत. त्यांची ही मानसिकता आहे. त्यांना झोपेतही वाटतं ही लोक आमच्यावर जोडे मारत आहेत. हे खरं आहे लोक त्यांच्यावर थुंकत आहेत. मी कशाला ते व्यक्त करु? असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वराच्या प्रांगणात आपण आहोत. मंदिरात, गावात कमालीची शांतता आहे. या वास्तुला प्राचीन, ऐतिहासिक महत्त्व आहे. मधल्या काळात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा प्रकारे धार्मिक तणाव निर्माण करून जात आणि धर्म वाद निर्माण करून हिंदुत्त्वाला बदनाम करू नये अशी भूमिका आमची आहे. मी तेव्हाही येऊ शकलो असतो, पण शांत झाल्यावर आलो. गावातील प्रमुख लोक भेटले. या गावाची बाजू घेतली, भूमिका मांडली याबाबत त्यांनी माझे धन्यवाद मानले.
संजय राऊत म्हणाले, गाव ही राजकारण करण्याची जागा नाही. काही लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला. पण या गावातील शांतताप्रिय लोकांनी तो डाव उधळून लावला. त्यामुळे हे आदर्श गाव आहे. अशाप्रकारे किती धार्मिक वाद निर्माण केले, पण गावाने सयंम राखला. महाराष्ट्रातील वातवरण, मंदिर, प्रथा परंपरांवरून खराब करू नये. त्र्यंबकेश्वर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराच्या विकासाचा प्रयत्न झाला पाहिजे. गोदावरी गायब झाली, गोदावरीचा प्रवाह सुरू करा. विकासाकरता प्राधिकरण तयार करा. अयोध्या प्राधिकरण झालं, त्यानुसार विकास होतोय. त्यामुळे मंदिराच्या विकासाकरता प्राधिकरण करण्याची आमची मागणी आहे.
या गावात अशाप्रकारचा तणाव निर्माण झाला नव्हता. प्रथा परंपरा चालू असतात. त्या तोडणं म्हणजे हिंदुत्त्व नाही. कोणीतरी उथळ पोरं येतात आणि हिंदुत्त्वावर बोलतात, आव्हानं देतात, हे कसलं हिंदुत्त्व? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, हिंदू खतरे में है असं म्हटलं जातंय, असा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना विचारला. त्यावर राऊत म्हणाले की, हिंदू अजिबात खरते में नाही. ते स्वतः खतरे में आहेत. ते स्वतः खतरेमध्ये आले त्यांचा पक्ष, नेता खतरेमध्ये येतो. आमचा हिंदू धर्म एवढा कमुकवत नाही. सर्वसमावेशक हिंदू धर्म आहे. हे नव हिंदू निर्माण झाले आहेत. त्यांना हिंदू धर्म कधीच कळणार नाही. त्यांना वीर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे कळले पाहिजेत मग त्यांना हिंदू धर्म कळेल, असा उपरोधिक टोलाही लगावला.