मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील अर्थात ८५ हजार ते एक लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या नागरीकांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळावेत यासाठी नवी योजना राज्य सरकारकडून आणण्यात आली आहे. ही योजना धर्मादाय रूग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या दुर्बल घटकातील नागरीकांसाठी लागू होणार असल्याची माहिती विधि व न्याय विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
विधि व न्याय विभागाच्या २३ फेब्रवारी, २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ४१ अ अ च्या प्रयोजनार्थ निर्धन व्यक्ती यांचे एकूण वार्षिक उत्पन्न हे पंच्याऐंशी हजार रुपये पेक्षा अधिक नसेल व दुर्बल घटकातील व्यक्ती यांचे एकूण वार्षिक उत्पन्न हे एक लाख साठ हजार पेक्षा अधिक नसेल, अशी मर्यादा विनिर्दिष्ट केलेली आहे.
राज्यातील धर्मादाय रुग्णालयात सदर निर्धन व्यक्ती ही मोफत उपचार मिळण्यास तसेच दुर्बल घटकातील व्यक्ती ही सवलतीच्या दरात उपचार मिळण्यास पात्र असेल, असे सहायक धर्मादाय आयुक्त (रुग्णालय), बृहन्मुंबई विभाग, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.