राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे कोविड काळातही आताही सातत्याने महाराष्ट्राबरोबर देशातील अनेक भागात जात सातत्याने दौरे करत असतात. मात्र काही जणांनी त्यांच्या वयाचा उल्लेख केल्यास स्वतः शरद पवार हे मला म्हातारा म्हणू नका, किंवा वय झालंय असे म्हणून मला निवृत्त व्हा असे सांगू नका असा प्रेमळ सूचना करायचे. परंतु त्यांचेच पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा हाच धागा पकडत त्यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित आता घरी आराम करायला हवा आणि हट्टीपणा सोडा अशी थेट सूचना करत राजीनामा परत घ्यायचा होता तर दिला कशाला ? असा सवालही केला.
शरद पवार यांच्या नेतृत्वापासून फारकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार यांनी दावा सांगितला. तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटाच्या समर्थक आमदार-कार्यकर्त्यांची बैठक वांद्रे येथे घेतली. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांना सक्तीच्या रजेवर जवळपास पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, प्रफुल पटेल आदी नेते आणि अनेक आमदार उपस्थित होते. अजित पवार यांनीही डॅशिंग अंदाजात भाषण केलं. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीची त्यांनी एकप्रकारे चिरफाडच केली.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, एक वय असतं. त्या वयात थांबावं लागतं. मग तो शेतकरी असो, शासकीय अधिकारी असो वा उद्योपती किंवा राजकारणी… पण वरिष्ठ नेते थांबालयाच तयार नाहीत. ते खूप हट्टी आहेत? पण हे नेमकं कशासाठी? मी सुप्रियाला सांगितलं की तू साहेबांशी बोल, समजावून सांग… पण नाही, त्यांना थांबायचंच नाही. तरुण नेतृत्वाला त्यांना आशीर्वाद द्यायला काय हरकत आहे? मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? चुकलं तर चुकलं म्हणून सांगा, पण तसं ते करत नाही, असा हल्लाबोल करताना मागील महिन्यातही त्यांनी राजीनामा दिला आणि तो परतही घेतला. मग राजीनामा परत घ्यायचाच होता तर दिला कशाला? असा सवाल शरद पवार यांना केला.
अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्या मुशीत मी घडलो, त्यांच्या छत्रछायेखाली माझी जडण घडण झाली. ते आपले श्रद्धास्थान आहे. राज्यपातळीवर आणि देशपातळीवर राजकारण चाललंय ते पाहता काही निर्णय गरजेचे आहेत. एखादा पक्ष कशासाठी काम करतो तर लोकांच्या विकासासाठी असे सांगत अजित पवार पुढे म्हणाले, आपल्या वरिष्ठ नेत्यांनी १९६२ ला राजकारणाची सुरुवात केली, ६७ साली आमदार झाले, पुढे मंत्री झाले, १९७८ ला वसंतदादांचं सरकार पाडून साहेब मुख्यमंत्री झाले, १९८० ला पुलोदचा प्रयोग झाला. जेव्हाचा जनसंघ आताचा भाजपा साहेबांच्यासोबत होता. १९८० ला निवडणुका झाल्या, इंदिराजींची लाट झाली. इंदिराजी पंतप्रधान झाल्या. इतिहास बघितला तर या देशाला कुणी ना कुणी करिश्मा असलेलं नेतृत्व लागतं. १९७७ ला देशपातळीवर असणारा जनसंघ कुठेय? तर तो शोधावा लागतोय. कारण करिश्मा असणारं नेतृत्व नव्हतं. १९८६ साली समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलिन झाली. पवारसाहेबांना देशाने गेली ५५ वर्ष साथ दिली, असं सांगतानाच अजित पवार यांनी विलिनिकरणाचा इतिहास मांडला.
साहेबांनी समाजवादी काँग्रेस, मूळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकारण केलं. वयाच्या पंचवीशी पासून पंच्याहत्तरीपर्यंत उत्तम काम करू शकले. असं सांगतानाच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दाची आढावा घेतला. प्रत्येक नेत्याचा एक काळ असतो.
पुढे अजित पवार म्हणाले, सोनिया गांधी परदेशी आहेत. परदेशी व्यक्ती या देशाच्या पंतप्रधान होऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. आपण ऐकलं. नंतर १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापन झाली. त्यावेळी छगन भुजबळांनी मोलाचं काम केलं. आपल्याला ५८ जागा मिळाल्या. काँग्रेसला ७५ जागा मिळाल्या. त्यावेळी सरकार आलं. मी-आर आर पाटील-जयंत पाटील-सुनील तटकरे यांनी मंत्री म्हणून काम केलं. मला पहिल्या टर्मला कृष्णा खोऱ्याचे ७ जिल्हे मिळाले. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही, हे उभा महाराष्ट्र जाणतो. सकाळी-पहाटे कामाला सुरुवात करायचो-आजही करतो. मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. कशासाठी तर महाराष्ट्रासाठी… २००४ ला काँग्रेसचे ६९ आमदार होते, राष्ट्रवादीचे ७१ आमदार निवडून आले. सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं राष्ट्रवादीच्या जागा जास्त आहेत, त्यांना सीएम पोस्ट द्यावी लागेल. त्यावेळी विलासरावांनी आम्हाला विचारलं, तुमच्यात सीएम कोण होईल..? चार मंत्रिपदं जास्त घेऊन, आलेली संधी सोडून देण्यात आली… पण ती संधी घेतली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिसला असता ही खंतही सांगितली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी आयोजित बैठकीत संवाद. एमईटी, मुंबई.https://t.co/qse0gOhlFH
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 5, 2023