सध्याचे सुरु असलेले पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेते विना पार पडणार की काय अशी? शक्यता वाटत होती. त्यामुळे मी प्रत्येक वेळी त्यांना विचारयाचो की कधी येणार कधी येणार ? मी काही माझ्याकडच्या लोकांना नाही तर समोरच्या बाकावर बसलेल्या फ्रंटलाईनला बसणाऱ्या नेत्यांना विचारत होतो. विजय वडेट्टीवार हे मुळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते कुठेही गेले तरी त्यांचा मुळ शिवसैनिकाचा स्वभाव जात नाही. पण मी एक पाह्यलं हा लोकांमध्ये जाऊन काम करणार माणूस पाह्यल्याचं बघायला मिळाला. मी ही विरोधी पक्षनेता होतो. नाना पटोले ही अध्यक्ष होते. पण त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे…ते इकडचे आहेत असं मी म्हणणार नाही. त्यांचा स्वभाव चांगलाच आहे. पण त्यांचा नाना करू नका असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावताच एकच हशा पिकला.
अजित पवार राष्ट्रवादीच्या मोठ्या गटासह सरकारमध्ये सामील झाल्यामुळे काँग्रेसकडे हे पद जाणार हे निश्चित झालं होतं. मात्र, ते नेमकं कुणाला मिळणार? याविषयी तर्क-वितर्क चालू होते. अखेर सोमवारी या चर्चेवर पडदा पडला. काँग्रेसच्या विधिमंडळ आमदारांनी विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते करावे अशी शिफारस अध्यक्षांना केली. त्यानुसार आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विजय वडेट्टीवार हे विदर्भातले नेते आहेत. आमचे उपमुख्यमंत्रीही विदर्भातले आहेत. विदर्भाच्या पाण्याचा एक वेगळा गुण असतो. त्यामुळे महाराष्ट्राला आजवरच्या इतिहासात विदर्भातले चार मुख्यमंत्री मिळाले. विदर्भच्या सुनेला देशाचं राष्ट्रपतीपदही मिळालं ही विदर्भाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. पाहुणचार करण्यात विदर्भाचा हातही कुणी धरू शकत नाही. तिथे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे सगळे ऋतू कडक असतात. विदर्भातलं जेवणही कडक असतं. सावजी वगैरे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हणताच सभागृहातील सर्वच सदस्यांनी त्याला अनुमोदन दिलं.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी कडक वृत्तीचा उल्लेख करताना काही सदस्यांनी शिवसैनिक असण्याचा बसल्या जागेवरूनच उल्लेख केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी “तसे ते मूळचे शिवसैनिकच आहेत ना”, असं म्हणत विजय वडेट्टीवारांना कोपरखळी मारली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बेधडकपणा विदर्भातल्या लोकांमध्ये आढळतो. आज विजयभाऊंवर तसा अन्यायच झाला आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नाना पटोले, बाळासाहेब यांनी विरोधी पक्षनेतेपदावर बसवायला हवं होतं. आम्हाला वाटलं अधिवेशन असंच विरोधी पक्षनेत्याशिवाय जातंय की काय, असं म्हणताच सत्ताधारी बाकांवरच्या आमदारांनी हसून त्याला दाद दिली.
दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विजय वडेट्टीवार मागच्या बाकांवर बसायचे. त्यांना मी म्हणायचो तुम्ही कधी येणार? असं म्हणत एकनाथ शिंदेंनी आपल्या बाजूने हाताने इशारा केला. पण काहींच्या भुवया उंचावताच म्हणजे पुढच्या बाकांवर असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा टोला लगावला.
ते म्हणाले दोन-चार दिवसांत होईल. या बाजूला नाही, पुढच्या बाकांवर म्हणालो, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आता आम्ही त्यांना हात मिळवत होतो तर तुमचे सगळे चेहरे घाबरले होते. तुम्ही विजय भाऊंना पकडूनच बसले होते, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. विरोधी बाकांवरच्या सदस्यांनीही याला हसून दाद दिली.
आपण खऱ्या अर्थाने लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी रथाची दोन चाकं असतो. आपण राज्याच्या विकासासाठी समान वेगाने धावण्याचा प्रयत्न करतो. विरोधी पक्षनेता हा सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक आहे. विरोधी पक्षही आवश्यक आहे. एखादी गोष्ट चुकीची झाली, पटली नाही, सरकार कुठे कमी पडलं, तर विरोधी पक्षनेत्याने, विरोधी पक्षांनी जनतेच्या हितासाठी सभागृहात बोलणं ही काळाची गरज आहे. पण सरकार जेव्हा चांगलं काम करतं, तेव्हा सरकारच्या चांगल्या कामाची दखलही घेणं चांगल्या विरोधी पक्षाचं लक्षण असतं, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
विरोधी पक्षनेते म्हणून पदाला विजय वडेट्टीवार न्याय देतील अशी अपेक्षा आहे. विजय वडेट्टीवार मूळचे शिवसैनिक. त्यांचा स्वभावही आक्रमक, बेधडक, झोकून देऊन काम करणारा आहे. विदर्भाच्या पट्ट्यात शिवसेना वाढवण्याचं काम विजय वडेट्टीवार यांनी केलं. नेहमीच बाळासाहेबांचा ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हे तत्व विजयभाऊंनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही पाळलं, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काहीजण असे आहेत की खुर्ची गेल्यानंतर लपून बसतात. पण विजय वडेट्टीवार हे वर्क फ्रॉम होम करणारे नाहीत असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
लोकांमध्ये मिसळून काम करत असल्यावरच हे शक्य होते असे सांगत लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या लोकांना कितीही वाईट वेळ आली, नाराजी निर्माण झाली तरी भेटायचं नाही पण असे तुम्ही करत नाही असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
तसेच ऐन निवडणूकीच्या तोंडावर विरोधी पक्ष नेत्याचं पद विजय वडेट्टीवार यांच्याकडं दिलं जातं. अन् निवडणूका झाल्या की त्यांना… असं सूचक विधानही मुख्यमंत्री यांनी केलं.