मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु असतानाच जालना येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या आंदोलकांवर पोलिस लाठीचार्ज करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोक जखमी झाले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जालना येथील रूग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. यावेळी भेटीनंतर आंदोलनकर्त्यांच्या ठिकाणी जाऊन संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, मला माहितीनुसार मुंबई की कोठून पोलिसांना फोन आला. त्यानंतर आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. तो फोन कोणाचा होता याची माहिती आपल्याला नाही असेही स्पष्ट केले.
यावेळी शरद पवार म्हणाले की, काही जण माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या गोवारी समाजावर पोलिसांनी गोळीबार केल्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मात्र प्रत्येक विभागाची जबाबदारी त्या त्या खात्याच्या मंत्र्यांची असते. त्यावेळी ती जबाबदारी आदीवासी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर होती आणि त्या घटनेनंतर त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर पलटवार करत शरद पवार म्हणाले, आता पोलिसांची जबाबदारी ज्या विभागाकडे आहे त्या खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, असल्याचे सांगत भाजपा नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या उपोषण आंदोलनाच्या प्रश्नावर आज ५-६ वा दिवस आहे. आंदोलनकर्त्यांची तब्येत खालावली आहे. या परिस्थितीत उपोषणाचे सांसदीय हत्याचाराचा वापर करत आंदोलन करणाऱ्या निष्पाप नागरिक आंदोलनाकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. वास्तविक पाहता आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याची गरज नव्हती. परंतु पोलिसांनी बळाचा वापर केला. तत्पूर्वी पोलिसांना कुणाचा फोन आला असा सवालही केला.
शरद पवार म्हणाले की, पूर्वी मराठवाडा हा भाग निझामाच्या राजवटीकडे होता. तेव्हा येथे शेती करणाऱ्यांना कुणबी असे म्हटले जायचे. त्यामुळे कुणबी आणि मराठा हा समाजांना एकच मानण्याबाबत आम्ही संसदेत आवाज उठविणार असल्याचे सांगत कायद्याने आरक्षण मिळत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये आणि ५० टक्के आरक्षणाची मर्यादा काढून टाकून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणीही केली.
त्याचबरोबर शरद पवार म्हणाले, फोन कुणाचा आला याची माहिती आंदोलनकांनाही नव्हती. ती मला मिळाली आणि मी सांगितली. परंतु फोन कोणी केला याची माहिती नाही. परंतु इंडिया बैठकीच्या निमित्ताने सबंध देशभरात सरकार बदलाचे वारे असून त्या बैठकीवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी हा सारा उद्योग केल्याची शक्यता वाटते अशा संशयही यावेळी व्यक्त केला.
तसेच मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री शिंदे यांनी भूमिका घेत संवाद साधला याप्रकरणी शरद पवार म्हणाले, त्यांची भूमिका समजदारीची आहे. त्यामुळे आंदोलकर्त्यांनीही आंदोलनाच्या अनुषंगाने भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना भेटून माहिती घेतली. तत्पूर्वी जखमी असलेल्या नागरिकांचीही भेट घेतल्याचे स्पष्ट केले.
तसेच पोलिसांवर हल्ला झाला तरच पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा अधिकार आहे. मात्र पोलिसांवर हल्ला झाला नाही तर पोलिसांनी हल्ला केल्याचे दिसून येते. याबाबत पोलिसांना दोष देणार नाही कारण ती त्यांची नोकरी आहे. मात्र त्यांना कोणीतरी आदेश दिल्यानंतर त्यांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करायला हवी अशी मागणीही शरद पवार यांनी केली.
दरम्यान, उदयन राजे भोसले यांनीही आज आंदोलकांची भेट घेऊन मराठा आंदोलन कर्त्यांच्या प्रश्नावर मंत्रिमंडळ बैठक घेऊन याप्रश्नी निर्णय घ्यायला लावू असे भाष्य केले आहे. त्यामुळे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिकाही मांडली. त्यामुळे त्यांनी म्हटल्याप्रमाणे काय होते त्यानंतर बघु असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.