भारतीय संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून येत्या २५ नोव्हेंबर रोजी दादरमधील शिवाजी पार्क येथे ‘संविधान सन्मान महासभे’चे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी याना देण्यात येणार असल्याची माहिती वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
बॅलार्ड पिअर्स येथील वंचितच्या राज्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, भारतीय संविधानाने या देशातील शोषित, वंचित, अल्पसंख्यांक, दलित – आदिवासी, ओबीसी व धार्मिक समुह या सर्वांच्या हक्क अधिकारांचे संरक्षण केले आहे. समता, बंधुता आणि न्यायाची हमी दिली आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीच्या वतीने संविधान सादर केले. यानिमित्ताने देशात दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो, यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईच्या शिवाजी पार्कवर संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यांनी दिली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशभरात संविधानिक संस्था, लोकशाही धोक्यात असताना संविधानाच्या सन्मानार्थ महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मुंबई शहरातून मोठ्या प्रमाणात या सभेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि संविधान प्रेमी जनतेकडून प्रचार सुरू आहे. ही महासभा देशातील संविधान प्रेमी जनतेला एक नवीन दिशा देणारी सभा ठरेल असेही सांगितले.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, भाजपा- आरएसएस वैदिक व्यवस्था मानतात, त्यामुळे त्यांना वैदिक धर्मावर आधारित संविधान हवे आहे. त्यांच्या अजेंड्यात बंधुत्व, स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य नाही. पण आताचे भारतीय संविधान हे संतांच्या भूमिकेला आणि फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे आहे. संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निमंत्रण देण्याचा निर्णय आमच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे. त्यानुसार राहुल यांना आम्ही निमंत्रित करणार आहोत असेही स्पष्ट केले.