उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे संघटना बांधणीच्या कामासाठी सध्या नाशिक दौऱ्यावर असतानाच आज ठाकरे गटातील ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकार करत असलेली कामे लोकांना आवडत असल्याने कार्यकर्त्ये प्रवेश करत आहेत. त्यांना विश्वास वाटत असल्यानेच असे पक्षप्रवेश सोहळे पार पडत असल्याचे वक्तव्य केले.
या पक्षप्रवेश सोहळ्याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, नाशिकमधील शिवसेना जागेवरच आहे तशी आहे. त्यांच्या गटात कोण गेले, त्यांची नावं सुध्दा नाशिककरांना माहित नाहीत. त्यामुळे सध्या मेंढर पकडायची अनं खाटीकखान्यात न्यायची असे सुरु असल्याची खोचक टीका शिंदे गटावर केली.
संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून ते आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिंदे गटात जे गेले त्यांची नावे कोणालाही माहिती नाहीत. दोन-चार लोक गेले असतील मात्र नाशिकमधील शिवसेना आहे तशीच आहे.
नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी आहे. दोन-चार दलाल, ठेकेदार गेले असतील. मात्र प्रत्येक शिवसेनेचा पदाधिकारी, शिवसेना, शिवसैनिक जागेवर आहेत. शिंदे गटात कोण दाखल झालंय हे कोणालाही माहिती नाही. त्यांची नावं कोणालाही माहिती नाहीत. मेंढरं पकडायची आणि खाटिकखान्यात न्यायची, असे सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
मी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार आहे, असा गर्भित इशारा राणे यांनी दिल्याबाबत विचारले असता राऊतांनी प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, आम्ही त्यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच आम्ही पक्ष बदलणारे नाही. त्यांनी धाडसाच्या गोष्टी बोलाव्यात का? मी अद्याप त्यांच्याबाबत काहीच बोललेलो नाही. ते आमचे सहकारी होते. त्यांनी धमक्या देऊ नये. धमक्या देत असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची. हे मला तुरुंगात काय टाकणार. मी माझ्या पक्षासाठी हिमतीने तुरुंगात गेलो आहे, असा इशाराही दिला.