महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी अनेक ठिकाणी औरंगजेबाचे पोस्टर्स आणि सोशल मीडिया स्टेटसवरून दंगली घडल्या होत्या. या दंगलींचा मुद्दा विधीमंडळाच्या अधिवेशनातही गाजला. याबाबत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्याला अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. परंतु, कुणी औरंगजेबाचं महिमामंडन करणार असेल, तर त्याला सोडणार नाही,असा इशारा दिला. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, औरंगजेब हे देवेंद्र फडणवीस यांचे आदर्श होऊ शकत नाहीत. मात्र औरंगजेब संपूर्ण देशाचा होता ना असे जोरदार प्रत्युत्तर देत फडणवीस आणि आरएसएस म्हणजे देश नव्हे असा मल्लिनाथीही लगावली.
देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत म्हणाले, अचानक एकाच वेळी राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचे पोस्टर, मिरवणुकी, स्टेटस अशी प्रकरणं समोर आली. हा काही योगायोग नव्हता, तर हा प्रयोग आहे. आजपर्यंत भारतीय मुस्लिमांचा हिरो औरंगजेब कधीच नव्हता. तो कधी होणारही नाही. औरंगजेब हा आक्रांत होता. या देशाचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहेत. ए. पी. जे अब्दुल कलाम हे देशाचे हिरो होऊ शकतात. पण, औरंगजेब कधीच नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, औरंगजेब हा टर्कीक मंगोल वंशाचा होता. टर्कीक मंगोल वंशाचे पाच लाखांच्या आसपास लोक भारतात आणि पाकिस्तानात आहेत. त्यामुळे आता त्याचे वंशजही भारतात नाहीत. राज्यात त्याच्या नावाने ज्या दंगली झाल्या, त्याच्या पाठीमागे कोण आहे? हे काही प्रमाणात लक्षात आलं आहे. काहींना अटकही केली आहे. कोणत्याही परिस्थितीत धर्म आणि जातीच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. परंतु, कोणीही औरंगजेबाचं महिमामंडन करणार असेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही, असा इशारा दिला.
देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी ते एका खाजी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, हे कायद्याचं राज्य आहे. कोणीही कबरीवर जाऊ नये, मजारवर जाऊ नये किवा कुठल्याही सांधू-संताच्या समाधीवर जाऊ नये, असं त्यांचं म्हणणं असेल तर मग कायदा करा. मग लोक तिथे जाणार नाहीत. तुम्ही कायदा करत नाही मग म्हणता जाता कशाला?
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, एकतर कायद्याचं राज्य किंवा बिना कायद्याचं राज्य असतं. दोनपैकी एक काहीतरी आम्हाला सांगा. आम्ही कायद्याचं राज्य मानतो. त्यामुळे असा कुठलाही कायदा नसल्याने (मजार किंवा कबरीवर जाऊन नये असा कायदा) आम्ही कोणाच्याही समाधीवर जाऊ. औरंगजेब हा फडणवीसांचा आदर्श होऊ शकत नाही. पण, देशाचा होतो ना! हे कशाला विसरत आहात? देवेंद्र फडणवीस किंवा आरएसएस हे काही देश नाहीत असे स्पष्टोक्तीही केली.