Breaking News

वातावरण तापले दोन्ही उपमुख्यमंत्री गायबः मुख्यमंत्री म्हणाले,… आरक्षण देणार सर्वसामान्यांच्या हितासाठी गतीने निर्णय घेणारे सरकार

मागील पाच-सहा दिवसापासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी जालन्यातील अंबड तालुक्यातील गावी आंदोलन सुरु आहे. त्यातच पोलिसांनी या आंदोलकांवर दोन दिवसाखाली लाठीचार्ज करत वातावरण आणखीनच बिघडवले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मराठवाड्यातील बुलढाणा येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमाला राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अनुक्रमे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दांडी मारली. त्यामुळे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकट्याने उपस्थित रहात मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे निर्धारपूर्वक उपस्थित समुदायाला सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या नियोजित दौऱ्यासाठी लेह येथे गेले आहेत. त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहु शकले नाहीत. तर ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी सांगितल्यानुसार अजित पवार यांची तब्येत बरी नसल्याने ते येवू शकले नसल्याचे सांगत तरीही आपण ठरल्याप्रमाणे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पाडत आहोत आणि त्यासाठी आपण आलो असल्याचे सांगितले.

दरम्यान, राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकाचे सरकार आहे. शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख निर्णय घेण्यात येत आहेत. आतापर्यंत केवळ जनतेच्या व्यापक हिताच्या निर्णयाला प्राधान्य देण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावरून उतरून मदत करणारे सरकार आहे. येत्या काळातही सर्वसामान्याच्या हितासाठी गतीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

बुलडाणा येथील कऱ्हाळे ले आऊटजवळील मैदानात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आज पार पडला, यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, सर्वश्री आमदार किरण सरनाईक, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सुरू केल्यापासून शासकीय यंत्रणा सक्रिय झाली असून नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत आहे. राज्यात सातत्याने कार्यक्रम घेण्यात आले आहे. यातून आतापर्यंत एक कोटी ६१ लाख नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. या उपक्रमातून नागरिकांच्या दारापर्यंत जाणारे देशातील एकमेव राज्य आहे. अभियानातून बुलडाणा जिल्ह्यात आजच्या दिवशी १ लाख तर आतापर्यंत १७ लाख ४३ हजार नागरिकांना लाभ देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जालना जिल्ह्यात घडलेली घटना दुर्देवी आहे. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. आवश्यकता भासल्यास न्यायालयीन चौकशी करण्यात येऊन यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यासोबतच मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे असेल. आरक्षण देण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाहीही दिली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वाटप

कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात लाभ देण्यात आले. यात सुनीता प्रशांत खरे, रा. सुंदरखेड, ता. बुलडाणा, (पिठाची चक्की), राजू भीमराव हिवाळे, रा. भीमनगर वार्ड, क्रमांक दोन, बुलढाणा, (वाहन करातून सूट), हरिदास काळमेघ, रा. काकोडा, ता. संग्रामपूर, (विमा संरक्षण निधी), टी. एस. घुले, कुलाभवानी फार्मर प्रोड्युसर कंपनी, रा. वडगाव पाटण, ता. जामोद, (ड्रोन), रामेश्वर मदनराव कोल्हे, रा. धोडप, ता. चिखली, (सामाजिक कल्याण), ज्योती निलेश पाटील, रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली, (कुकुट पालन), चंद्रकला मनोहर सोनवणे, बुलडाणा, (आत्मनिर्भर निधी), शितल पंडीत खंडागळे, रा. कोलवड, ता. बुलडाणा, (प्रधानमंत्री मातृवंदन योजना), भूषण विनायक काळे, रा. राऊतवाडी, ता. चिखली, (अनुकंपा नोकर भरती), सविता गजानन आंधळे, रा. खामगाव, (राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय), प्रभाकर शंकर पहूरकर, रा. भानेगाव, ता. शेगाव, (प्रधानमंत्री मत्स्य योजनेतून इन्सुलेटेड वाहन), प्रियंका गजानन ताटे, रा. बुलडाणा, (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम), लता कृष्णा गवते, रा. चिखली, (ई-व्हेईकल), अनुराधा सोळंकी, रा. पाटोदा, ता. चिखली, (खेळाचे अद्ययावत साहित्य), सुमेध तायडे व कीर्ती तायडे, रा. संग्रामपूर, (सामुदायिक विवाह), पी. पी. सोनुने, रा. मलकापूर, (स्मार्ट प्रकल्प), उषा विजय मिसाळ, रा. बुलडाणा, (नागरी जीवनोन्नती अभियान), सरला गजानन जाधव, रा. कोलवड, (ग्रामीण जीवनोन्नती), निर्मला देशमुख, रा. मेहकर, मंगला शेजोळ, रा. देऊळगाव माही (ट्रॅक्टर), प्रथमेश जवकर, रा. बुलडाणा, (खेळाचे साहित्य), ऋषीकेश ढारे, रा. शेगाव, अर्चना जाधव, रा. वरवट बकाल, ता. संग्रामपूर, राहुल लोखंडे, रा. भालगाव, ता. चिखली (रोजगार मेळावा) या लाभार्थ्यांना लाभ देऊन गौरविण्यात आले. तसेच चांद्रयान मोहिमेत योगदान देणारे उद्योजक गितीका जयेश विकमशी आणि राजेंद्र भोसले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *