मुंबई उपनगरातील उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात जमिनीच्या वादातून स्थानिक भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे समर्थक महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रात्री झालेली घटना म्हणजे राजकिय गुंडगिरीचा कळस असल्याची टीका करत कायदा सुव्यवस्थेचे वाटोळे करणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळात सुरु असलेली गँगवॉर आता रस्त्यावर आली आहे. महाराष्ट्रात कल्याण येथे काल रात्री झालेली घटना म्हणजे राजकीय गुंडगिरीचा कळस आहे. महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत आणि वैचारिक वारसा जपणारे राज्य असले तरी या सत्ताधाऱ्यांच्या कृपेने सत्तेतला आमदारच, एका माजी नगरसेवकावर बंदुकीने गोळ्या झाडण्याचा प्रकार घडला. कोणाचे तरी भक्कम पाठबळ असल्याशिवाय एक आमदार अशी हिम्मत करूच शकत नाही. चोर तो चोर वर मुजोर म्हणत मला केलेल्या गुन्ह्याचा कोणताही पश्चाताप नाही असे वक्तव्य या आमदाराकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. ही राजकीय गुंडगिरी महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही यावेळी दिला.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, मी हा मुद्दा इथे नाही दिल्ली दरबारी सोमवारी पार्लमेंट मध्ये उचलणार आहे असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारा हा प्रकार बघायला लागणे म्हणजे महाराष्ट्राच्या नवोदित राजकीय पिढीचे दुर्दैव म्हणावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा हा महाराष्ट्र राजकीय गुंडांचा खुला मंच बनत चालला आहे. या अमानवी प्रकारांना आळा बसलाच पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.
तसेच पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पोलिसांच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललय तरी काय गुंडाराज आहे हे. हा महाराष्ट्र छत्रपतींचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. अशा सुसंस्कृत गँगवॉर चालले असतील, आणि त्या पोलिस स्टेशनमध्ये सत्तेमध्ये असलेले आमदार करत असतील तर यांच्यावर स्ट्राँग अक्शन झाली पाहिजे अशी मागणी केली.
तसेच सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेशी खेळ करण्याचं ओपन लायसन्स गृहमंत्री फडणवीस यांनी भाजपाच्या नेत्यांना दिलंय का? पुण्यात भाजपाचे आमदार पोलिसांच्या श्रीमुखात भडकावितात आणि उल्हासनगरमध्ये माजी नगरसेवकांवर गोळीबार करतात. हि या खोके सरकारची सत्ता आणि पैशांची मस्ती आहे. यांचा खेळ होतो पण सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे मात्र हाल होतात. भरीत भर म्हणजे गोळीबार करणारे भाजपा आमदार ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यावर राज्यात गुंडगिरीच वाढणार’ असा थेट आरोप करतात. हा आरोप अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात भाजपाचे खुले ‘गुंडाराज’ सुरु आहे आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांतपणे हे सगळं पाहत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेची गांभिर्याने दखल घेऊन महाराष्ट्र सरकार तातडीने बरखास्त करायला हवे. शांतताप्रिय सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी गुंडगिरी खपवून घेता कामा नये असा इशाराही यावेळी दिला.